पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६ चे निकाल लागल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच राज्यात तीव्र हिंसाचार उसळला आहे. मंगळवारी (५ मे) उशिरा रात्री संदेशखाली येथे गस्त घालणाऱ्या पोलीस आणि केंद्रीय दलांच्या पथकावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात पाच सुरक्षाकर्मी गोळी लागून गंभीर जखमी झाले. ही घटना नजत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सरबेरिया अगरहाटी ग्रामपंचायतीतील बामन घेरी परिसरात घडली. मंगळवारी रात्री पोलीस आणि CRPF च्या संयुक्त पथकाने गस्त घालत असताना तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांना लक्ष्य केले.
या हल्ल्यात नजत पोलीस ठाण्याचे प्रभारी (OC) भरत पुरकैत, राजबाडी चौकीतील कर्मचारी भास्वत गोस्वामी आणि एक महिला पोलीस अधिकारी जखमी झाले. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेले दोन CRPF जवानही गोळीबारात जखमी झाले. सर्व जखमींना प्रथम मिनाखा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना कोलकात्यातील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.
निवडणुकीनंतर भडकलेल्या या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी कडक निर्देश दिले आहेत. मुख्य सचिव, DGP, कोलकाता पोलीस आयुक्त तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सतत गस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हिंसा भडकवणाऱ्यांना तात्काळ अटक करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, संदेशखाली विधानसभा मतदारसंघात भाजपचे सनत सरदार यांनी ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी तृणमूलच्या झरना सरदार यांचा १७,५१० मतांनी पराभव केला. सनत सरदार यांना १,०७,१८९ मते मिळाली, तर तृणमूल उमेदवाराला ८९,६७९ मतांवर समाधान मानावे लागले.
राज्यात भाजपला २०७ जागांसह प्रचंड बहुमत मिळूनही विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पराभव मान्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले, “मी राजीनामा देणार नाही. मी हरलेली नाही. अधिकृतरीत्या ते आम्हाला हरवू शकतात, पण नैतिकदृष्ट्या आम्हीच विजयी आहोत. लोकशाही प्रक्रियेची लूट झाली आहे.” ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करत ईव्हीएममध्ये छेडछाड आणि मतमोजणीदरम्यान मारहाण झाल्याचे दावे केले आहेत. भाजपने हे आरोप ‘निराधार’ असल्याचे सांगत त्यांना पराभवातून आलेली निराशा असे म्हटले आहे.
हे ही वाचा:
भाजपच्या विजयानंतर तीस्ता कराराचा लांबलेला प्रश्न सुटणार?
बंगालमधील सरकारी कर्मचारी भयमुक्त; दिल्या जय श्रीरामच्या घोषणा
पाकिस्तानच्या पेशावरमधील अमेरिकन वाणिज्य दूतावास होणार बंद
कोलकातामधील टीएमसी कार्यालयावर बुलडोझर कारवाई
२०२६ च्या निकालांनी तृणमूलला मोठा धक्का बसला आहे. कॅबिनेटमधील सुमारे ६३ टक्के सदस्य, ज्यामध्ये शिक्षण, उद्योग आणि परिवहन यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचे २२ मंत्री समाविष्ट आहेत, ते पराभूत झाले आहेत. स्वतः मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाही भवानीपूर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचे सरकार ९ मे रोजी शपथ घेणार आहे. हा दिवस कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीचा असून, ‘सोनार बांग्ला’च्या नव्या पर्वाची सुरुवात म्हणून हा दिवस निवडण्यात आला आहे.







