महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत रत्नागिरीतील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांवरुन पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन संशयितांना अटक केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने रत्नागिरीतील एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
एटीएसकडे या व्यक्तीविषयी गुप्त माहिती होती आणि त्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने या व्यक्तीला पकडलं असून त्याची चौकशी सुरु आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. चौकशीतून माहिती उघड झाल्यास आणि या प्रकरणात त्याचा सहभाग असल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, असंही सांगण्यात आलं.
काही दिवसांपूर्वी एटीएसने पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावं समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती समोर आली आहे.
मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन दहशतवाद्यांना मागील सोमवारी मध्यरात्री गस्तीवर असलेल्या दोन पोलीस कॉन्स्टेबल्सनी संशयास्पद हालचाली जाणवल्याने पकडले. यावेळी त्यांचा तिसरा साथीदार मोहम्मद शहनवाज आलम हा पळून जाण्यात यशस्वी झाला. अटकेतील दोघांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस कोठडी सुनावण्यात आली. तिसऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
हे ही वाचा:
वंदे भारतवर दगडफेक करणाऱ्यांनी केले ५५ लाखांचे नुकसान
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; तीन पक्षांमध्ये ‘अशी’ होणार वाटणी
वाजवा रे वाजवा! आता विवाहसोहळ्यात बॉलीवूड गाण्यांना बंदी नाही
अडीच वर्षांत अडीच दिवसही मंत्रालयात गेले नाहीत ते मोदींना नऊ वर्षांत काय केलं विचारतायत
पोलिसांनी मोहम्मद युनुस खान आणि मोहम्मद युसुफ यांना हटकले असता त्यांनी त्यांची खोटी नावे सांगितली. मात्र पोलीस कॉन्स्टेबल्सनी ट्रु कॉलरच्या सहाय्याने फोन लावून पाहिला असता त्यांची वेगळीच नावे फोनवर दिसून आली. त्यानंतर पोलीसांनी ते दोघे राहत असलेल्या कोंढव्यातील घरी जाऊन तपास केला असता इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेसाठी ते काम करत असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्याकडे महत्त्वाचे नकाशे आणि इतर साहित्य आढळून आलं. हे दोघेही बनावट नावाने गेल्या दीड वर्षापासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते.







