मानखुर्द येथील जनता नगर भागात रविवारी रात्री घरांच्या ढिगाऱ्याखाली दबून झालेल्या भीषण दुर्घटनेत ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, एका तरुणावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मानखुर्दच्या हनुमान मंदिरामागील जनता नगर येथील चाळ क्र. ५ मध्ये रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अचानक ‘जी+३’ (ग्राउंड प्लस थ्री) स्वरूपाची दोन ते तीन घरे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. या ढिगाऱ्याखाली अनेक नागरिक दबल्याची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनात एकच धावपळ उडाली.
मानखुर्द पोलीस ठाणे गु.र.क्र. ४२५/२०२६अन्वये भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम १०५ व ३(५) अंतर्गत दि. ६ जुलै रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हा दि. ५ जुलै रोजी सुमारे साडेआठ वाजता जनता नगर, न्यू मंडाळा, मानखुर्द येथे घडलेल्या इमारत दुर्घटनेसंदर्भात दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
नैसर्गिक चक्रामुळे असामान्य परिस्थिती, नाशिकमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता
नारळाला ‘गल्फ’मधून मागणी; तीन महिन्यांच्या मंदीनंतर निर्यात पुन्हा रुळावर
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा!
पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना
फिर्यादीच्या (मोहम्मद मुख्तार अब्दुल अली शेख, ५३ वर्ष, न्यू मंडळा मानखुर्द मुंबई) तक्रारीनुसार, संबंधित ठिकाणी कोणतीही आवश्यक सुरक्षितता न पाळता अनधिकृत चार मजली इमारतीचे बांधकाम करण्यात आले होते. इमारत गेल्या काही दिवसांपासून धोकादायक अवस्थेत असल्याची माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले. तसेच शेजारील झोपडीमध्येही आवश्यक सुरक्षिततेच्या उपाययोजना उपलब्ध करून देण्यात आल्या नव्हत्या. परिणामी संबंधित चार मजली इमारत कोसळून शेजारील झोपडीवर पडली आणि त्यामध्ये राहणाऱ्या सहा व्यक्तींचा मृत्यू झाला.
या प्रकरणी इमारतीचे मालक, बांधकामाशी संबंधित कंत्राटदार, झोपडी मालक तसेच अनधिकृत बांधकामास जाणीवपूर्वक प्रोत्साहन देणाऱ्या संबंधित खाजगी व शासकीय व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, वॉर्ड कर्मचारी आणि १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाले. युद्धपातळीवर बचावकार्य हाती घेत ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्यात आले.
या रुग्णालयात पाच जणांना नेण्यात आले होते, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. यामध्ये अलीया (७), मुस्कान (१४), निहाल (६), नाबिया (२) आणि सोनी (३२) यांचा समावेश आहे. या दुर्घटनेत मुन्नाफ (७) या मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. तर रेहान अली (२४) या तरुणावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, प्रशासनाकडून बचावकार्य पूर्ण करण्यात आले आहे.
