महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वेगवान वाऱ्यांमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. विधानसभेत राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करताना त्यांनी सांगितले की, बदलत्या नैसर्गिक चक्रामुळे असामान्य परिस्थिती निर्माण झाली असून, सरकार पूर्ण सतर्कतेने मदत व बचावकार्य राबवत आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सोमवारी राज्यातील अनेक भागांत ताशी सुमारे ५० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे एकाच दिवशी सुमारे ३५० झाडे कोसळली. मंगळवारी दुपारनंतर वाऱ्यांचा वेग ७० ते ८० किलोमीटर प्रतितास होण्याची शक्यता असून त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये ३०० एमएम पाऊस पडेल
नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या भागात उद्या ढगफुटी शक्य आहे. त्या भागात ३०० एमएमचा पाऊस पडू शकतो. तिथे प्रशासकीय पातळीवर योग्य ती खबरदारी घेत आहोत, उपाययोजना करत आहोत. ८ तारखेपर्यंत सातत्याने हे सगळे अलर्ट्स देण्यात आलेले आहेत. पालघर, वसई विरार परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहेत. अनेक रेल्वे ठप्प आहेत लोकांना तिथून बाजूला काढून सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, मुंबईत सोमवारी कोसळलेली इमारत ही अनधिकृत बांधकाम होती. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंकजवळ दरड कोसळण्याची घटनाही घडली आहे. बदलत्या नैसर्गिक चक्रामुळे अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
कोल्हापुरातही अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. ८ तारखेपर्यंत ही सगळी परिस्थिती असणार आहे. इंद्रायणी नदीचे सगळे पूल पाण्याखाली जातायत. वारकऱ्यांनीही देहू आणि आळंदी परिसरात न जाता थेट पुण्याचे येण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हे ही वाचा:
नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा!
“भारतातून प्रचंड पाठिंबा” अमेरिकेलाच एकमेव मित्र मानण्यास नेतान्याहूंचा नकार
जुलैच्या पहिल्याच आठवड्यात सरासरीपेक्षा ११ टक्के अधिक पाऊस
पावसाचा महाप्रलय! मुंबई-पुणे संपर्क तुटला
राज्यात ज्या भागांत नागरिक अडकले आहेत, तेथून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आजच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी सविस्तर माहिती दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना जोरदार वारे आणि मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले. विशेषतः युवकांनी पर्यटनस्थळे आणि निसर्गरम्य भागात जाणे टाळावे, असेही त्यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही राज्यातील अतिवृष्टीची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन सर्वांनी सहकार्य आणि सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले. विद्यमान परिस्थितीचा विचार करून विधानसभेचे कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील मुसळधार पावसामुळे १२ जणांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) जबाबदार धरली जावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बंद असल्याचाही उल्लेख करत सरकारने या संपूर्ण परिस्थितीवर सभागृहात सविस्तर निवेदन द्यावे, अशी मागणी केली.
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. नागरिकांनी जुना पुणे-मुंबई महामार्ग वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कशेडी आणि ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच वाकण–सुकेळी–खिंड महामार्गावर पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.







