स्वस्त थायलंड टूरचे आमिष ठरले जीवावर! तीन भारतीयांचे अपहरण

आठवडाभर अमानुष छळ; खंडणीसाठी कुटुंबीयांना धमक्या

स्वस्त थायलंड टूरचे आमिष ठरले जीवावर! तीन भारतीयांचे अपहरण

थायलंडमध्ये स्वस्त पर्यटन पॅकेजच्या आमिषाला बळी पडलेल्या तीन भारतीय नागरिकांना भीषण अनुभवाला सामोरे जावे लागले. पटाया येथे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीने या तिघांचे अपहरण करून त्यांना तब्बल आठवडाभर एका भाड्याच्या घरात कैद करून ठेवले. या काळात त्यांच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आले, बेदम मारहाण करण्यात आली आणि उपाशी ठेवत मानसिक छळही करण्यात आला. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबीयांकडून तब्बल २४ लाख थाई बात (सुमारे ₹७० लाख) खंडणी उकळण्यासाठी आरोपींनी सतत धमक्या दिल्या.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपींनी भारतातील नागरिकांना स्वस्त सात दिवसांच्या थायलंड टूरचे आकर्षक पॅकेज दाखवून पटायामध्ये बोलावले. मात्र, ते तेथे पोहोचताच त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना एका घरात डांबून ठेवून सतत छळ करण्यात आला. आरोपींनी पीडितांना त्यांच्या कुटुंबीयांना फोन करून खंडणीची रक्कम मागण्यास भाग पाडले. पैसे न दिल्यास जीव मारण्याची धमकीही देण्यात आली होती.
हे ही वाचा:
कोळसा घोटाळा प्रकरणात दिवंगत डॉ. मनमोहन सिंग निर्दोष

शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स ८८९ अंकांनी झेपावला

४९ लाखांचे बक्षीस असलेल्या आठ नक्षलवाद्यांची शरणागती

गोळीबाराचे आदेश शहांनी दिले…राहुल गांधींचे आरोप, माफीची मागणी

या घटनेची माहिती मिळताच थायलंड पोलिसांनी विशेष पथकाच्या मदतीने धाड टाकून तिन्ही भारतीयांची सुखरूप सुटका केली. त्यानंतर देशाबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या पाच भारतीय आरोपींना अटक करण्यात आली. या टोळीतील काही पाकिस्तानी संशयित आणि दुबईत बसून संपूर्ण कट रचणारा मुख्य सूत्रधार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या धक्कादायक घटनेमुळे परदेशातील स्वस्त पर्यटन पॅकेजच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणूक, अपहरण आणि खंडणीच्या रॅकेटकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे परदेशात प्रवास करताना केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह ट्रॅव्हल एजन्सीकडूनच बुकिंग करावे, आकर्षक पण संशयास्पद ऑफर्सना बळी पडू नये आणि प्रवासापूर्वी संबंधित कंपनीची सखोल पडताळणी करावी, असा इशारा सुरक्षा यंत्रणांनी दिला आहे.

Exit mobile version