अमरावती जिल्ह्यातील नागरिकांसाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. बच्चू कडू अध्यक्ष असलेल्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मोठा सायबर अटॅक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या हल्ल्यात विशेषतः बँकेच्या बडनेरा व मंगरूळ दस्तगीर शाखा टार्गेट करण्यात आल्या असून बँकेच्या इतर शाखाही सायबर हल्लेखोरांच्या रडारवर असल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोरांनी बँकेच्या संगणक प्रणालीत थेट प्रवेश करून विंडो होल्डरवर नवी फाईल तयार केल्याचे धक्कादायक वास्तव प्रकाशात आले आहे.
यामुळे बँकेच्या नेटवर्क व ग्राहकांच्या व्यवहाराची माहिती हॅकर्सपर्यंत गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.घटनेनंतर बँकेत प्रचंड खळबळ उडाली असून सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
याच पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज सकाळी अकरा वाजता संचालक मंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीत बँकेच्या आयटी सुरक्षेबाबत तसेच सायबर हल्ल्याच्या तपासासाठी पुढील पावले काय उचलायची यावर चर्चा होणार आहे.सायबर क्राईम विभागालाही या घटनेची माहिती देण्यात आली असून हल्ल्याचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू झाला आहे.
जिल्हा बँकेतील हजारो खातेदारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये चिंता पसरली आहे. हा हल्ला नेमका कुठून झाला, खातेदारांच्या ठेवी सुरक्षित आहेत का, बँकेच्या संगणक प्रणालीची सुरक्षा कितपत सक्षम आहे?हे सर्व प्रश्न आता उपस्थित होत आहेत. पुढील काही तासांत यावर अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे.







