आपली फळे सुरक्षित राखता यावीत म्हणून एक फळवाला चक्क फळांना उंदारांचे विष लावत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यातून त्या फळवाल्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिला आहे. मालाडमधील ही घटना आहे.
सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळ करण्याच्या या प्रकारात दोन फळ विक्रेत्यांनी फळांना उंदीर मारण्याचे औषध लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. राटोल हे विषारी औषध फळांवर हे फळवाले लावत असत. आता या दोन परप्रांतीय फळ विक्रेत्यांना मालाड पोलिसांनी अटक केली आहे. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मनसे सैनिकांनी त्या फळवाल्यांना चोप दिला.
रात्री गोदामात किंवा गाडीवर ठेवलेली फळे उंदरांनी खाऊ नयेत यासाठी हा प्रकार केला जात होता. पण हे विषारी औषध लावलेली फळे ग्राहक खरेदी करत होती. या फळांमुळे ग्राहकांना उलट्या, पोटदुखी, विषबाधा होण्याची शक्यता होती.
या घटनेनंतर सर्वसामान्य नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. या घटनेची माहिती मिळताच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसे नेते कुणाल साळुंके आणि इतर कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित विक्रेत्याला याबद्दल जाब विचारला. यानंतर त्या फळ विक्रेत्याला मनसे स्टाईलने मारहाण केली. त्यानंतर याप्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली.
हे ही वाचा:
…आणि ‘धुरंधर’ने असा बदला घेतला!
पुस्तकात न्यायालयीन भ्रष्टाचारावर धडा; सर्वोच्च न्यायालय संतापले
शक्तीपीठ महामार्गात अपप्रचारांचे अडथळे, वास्तव काय?
सकाळी उठल्यावर पाणी प्यावे की पिऊ नये? तज्ज्ञ काय सांगतात
मालाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुष्यंत चव्हाण तक्रारीची तात्काळ दखल घेत दोन फळ विक्रेत्यांना ताब्यात घेतले आहे. मनोज कुमार केसरवाणी आणि बिपीन केसरवाणी अशी या दोन आरोपींची नावे आहेत. यावेळी चौकशीदरम्यान आरोपींनी कबुली दिली की “उंदीर फळे खातात, म्हणून आम्ही त्यावर औषध लावत होतो. या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १२५, २७४, २७५ आणि २८६ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेचे गांभीर्य ओळखून मुंबई महापालिकेने कारवाई केली आहे. या संबंधित विक्रेत्याचे बेकायदेशीर दुकान जमीनदोस्त केले आहे. तसेच रात्री उशिरा फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी भेट देऊन फळांचे नमुने जप्त केले आहेत. या घटनेनंतर मालाड पोलिसांनी परिसरातील इतर फेरीवाल्यांचीही कसून चौकशी आणि कारवाई सुरू केली आहे.







