लखनऊच्या गोमतीनगर परिसरात पती-पत्नीमधील दीर्घकाळ सुरू असलेल्या वादाचा अत्यंत भीषण शेवट झाला. आयसीआयसीआय बँकेत कार्यरत असलेल्या दिव्या मिश्रा यांची बँकेबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर त्यांचे पती मानस वाजपेयी घरी पोहोचले आणि त्यांनी स्वतःच्या बहिणी तूलिका हिलाही गोळी मारली. त्यानंतर मानस यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. काही वेळातच एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने लखनऊमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, मानस आणि दिव्या यांचा विवाह २०१७ मध्ये झाला होता. मात्र काही वर्षांनी त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाला आणि २०२४ पासून दोघे वेगवेगळे राहत होते. गेल्या सुमारे वर्षभरापासून त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू होता. या प्रकरणादरम्यान आर्थिक बाबींवरूनही दोघांमध्ये वाद असल्याची माहिती समोर आली आहे. घटस्फोटासाठी दिव्या यांनी मानस यांच्याकडे सुमारे एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही मागणी आणि त्यामागील परिस्थिती नेमकी काय होती, याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे आर्थिक वादाला हत्येचे अंतिम कारण मानता येणार नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा:
गुजरातमध्ये बनावट दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू, २५ जणांची प्रकृती गंभीर
कॉकरोच जनता पार्टीला पाकिस्तानी भट्टीचे बळ…
दुःखात ‘देवाभाऊ’ बनले आधार, आज बहिणीच्या नव्या संसाराची बांधली गाठ
सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर FDAचा कडक बडगा
घटनेच्या दिवशी मानस यांनी दिव्या यांना फोन करून गोमतीनगरमधील त्यांच्या बँकेबाहेर भेटण्यासाठी बोलावले. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाल्यानंतर मानस यांनी दिव्या यांच्या डोक्यात गोळी झाडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर जखमी अवस्थेत दिव्या यांना रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर मानस घटनास्थळावरून हुसडिया चौकाजवळील आपल्या घरी गेले. तेथे त्यांनी बहिणी तूलिका यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. घटनास्थळावरून पोलिसांना तीन पिस्तुलेही मिळाली असून त्यांचा वापर नेमका कसा झाला, याचाही तपास सुरू आहे.
या प्रकरणात दिव्या आणि तूलिका यांच्यातील संबंधही तणावपूर्ण असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. दोन्ही कुटुंबांमधील जुने वाद, घटस्फोटाचा खटला, आर्थिक व्यवहार आणि घटनेपूर्वी झालेला संवाद यांची माहिती पोलीस गोळा करत आहेत. तसेच बँक आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून मानस नेमक्या कोणत्या मार्गाने घटनास्थळावरून घरी गेला, याचा मागोवा घेतला जात आहे. मानस यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमधूनही कौटुंबिक वाद आणि नात्यातील तणावाचा उल्लेख असल्याचे समोर आले आहे.
या घटनेने कौटुंबिक वाद किती टोकाला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय दिला आहे. सध्या पोलिसांचा तपास सुरू असून तिहेरी मृत्यूमागील नेमकी कारणे आणि घटनाक्रम तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहेत.
