मुंबईतील संघटित गुन्हेगारीचे स्वरूप पुन्हा एकदा बदलले आहे. यावेळी हा बदल केवळ नावांपुरता किंवा परिसरापुरता मर्यादित नसून, गुन्हे करण्याच्या आणि ते लपवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाल्याचे चित्र आहे. तंत्रज्ञान आणि दहशतीच्या धोकादायक संगमामुळे लॉरेन्स बिश्नोई गँग मुंबई पोलिसांसाठी गंभीर आव्हान ठरत आहे. पारंपरिक तपास यंत्रणांच्या मर्यादा मोडीत काढत बिश्नोई गँग एकामागोमाग हल्ले घडवत असून, पोलिसांना अद्याप ठोस धागेदोरे हाती लागलेले नाहीत.
डिजिटल प्लॅटफॉर्म झाले नवे शस्त्र
मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बिश्नोई गँग धमक्या देण्यासाठी आणि नेटवर्क चालवण्यासाठी व्हीओआयपी कॉल्स, एन्क्रिप्टेड अॅप्स तसेच सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. हे कॉल्स वेगवेगळ्या आणि सतत बदलणाऱ्या डिव्हाइस वरून केले जातात. सोशल मीडियावर धमकीचे पोस्ट काही काळासाठी टाकून त्याचे स्क्रीनशॉट घेतले जातात आणि नंतर ते हटवले जातात. “पूर्वी गुन्हेगार कोणत्या नंबरवरून किंवा कोणत्या चॅनेलवरून काम करत आहेत याचा अंदाज येत असे. आता डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे ते जवळपास अदृश्य झाले आहेत,” असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रार न झाल्यास तपास अडचणीत
तंत्रज्ञाना इतकीच मोठी अडचण पोलिसांसाठी म्हणजे भीती, बिश्नोई गँगकडून धमक्या मिळूनही अनेक जण औपचारिक तक्रार नोंदवण्याचे टाळतात. विशेषतः हाय-प्रोफाइल प्रकरणांमध्ये ही शांतता अधिकच गडद होत आहे. त्यामुळे अनेक घटना पोलिसांपर्यंत पोहोचतच नाहीत. “तक्रार नसेल तर आमचे हात बांधले जातात. खंडणीची खात्री करता येत नाही आणि पीडितांना साक्षीदारही बनवता येत नाही,” असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
‘डिस्पोजेबल शूटर’ची नवी रणनीती
बिश्नोई गँगची सर्वात मोठी ताकद म्हणजे बदललेली रणनीती. पूर्वी अंडरवर्ल्डकडे ओळखीचे शूटर असत, ज्यांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध होती. मात्र आता प्रत्येक हल्ल्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेले, अनोळखी युवक निवडले जात आहेत. सोशल मीडियावरून गँगस्टर संस्कृतीने प्रभावित झालेले हे युवक कमी पैशांत कामासाठी तयार होतात. त्यामुळे गुन्हे स्वस्त झाले असून तपास अधिक गुंतागुंतीचा झाला आहे.
सोशल मीडियावर जबाबदारी, कायद्यात नकार हल्ल्यानंतर जबाबदारी स्वीकारण्याची पद्धतही बदलली आहे. थेट मीडियाला फोन करण्याऐवजी आता सोशल मीडिया पोस्ट, स्टोरी किंवा हटवलेले मेसेज यांद्वारे अप्रत्यक्ष दावा केला जातो. मात्र कायदेशीरदृष्ट्या हे पुरावे कमकुवत ठरतात. “स्क्रीनशॉट न्यायालयात मजबूत पुरावा मानले जात नाहीत. त्यामुळे गँगला नकार देण्याची संधी मिळते,” असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे ही वाचा:
“राजकीय लढाया न्यायालयात लढू नका”
घसरणीनंतर गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी
बांगलादेशातील अल्पसंख्यकांसाठी १५ देशांतील हिंदू एकटवले!
पाकिस्तानने गुडघे टेकले; भारताविरोधात टी-२० वर्ल्डकप सामना खेळणार
मुंबई पोलिसांसमोर नवी लढाई
मुंबई पोलीस मान्य करतात की ही लढाई आता केवळ बंदुका किंवा अटक यापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही तंत्रज्ञान, मानसशास्त्र आणि विश्वासाची लढाई आहे. जोपर्यंत पीडित भीतीतून बाहेर येत नाहीत आणि तपास यंत्रणा डिजिटल गुन्ह्यांशी सामना करण्यासाठी नवी साधने वापरत नाहीत, तोपर्यंत हे आव्हान कायम राहणार आहे. तंत्रज्ञानाच्या आडून मुंबईतील अंडरवर्ल्ड अधिकच धोकादायक होत असल्याचे या प्रकारातून स्पष्ट होत आहे.







