मुंबईत दीड लाखाला विकलेल्या बाळाची पुन्हा तामिळनाडूत साडेचार लाखात विक्री

धारावी पोलिसांकडून आंतरराज्य बाल तस्करी टोळीचा पर्दाफाश

मुंबईत दीड लाखाला विकलेल्या बाळाची पुन्हा तामिळनाडूत साडेचार लाखात विक्री

​जन्मादात्या आई-वडिलांनीच अवघ्या सव्वालाखात विकलेल्या दीड वर्षाच्या चिमुरड्याची धारावी पोलिसांनी तामिळनाडूतून सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आंतरराज्य बाल तस्करी टोळीचा पर्दाफाश करत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. विविध दलालांच्या साखळीमार्फत हे बाळ तामिळनाडूतील एका अपत्यहीन दांपत्याला तब्बल ४ लाख ८० हजार रुपयांना विकण्यात आले होते.

​गोरेगाव येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या बालकाच्या मामाने पोलिसांत धाव घेतल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. सुरुवातीला पावसात पडून बालकाचा मृत्यू झाल्याचा बनाव कुटुंबियांनी रचला होता. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच २ ऑगस्ट रोजी पतीसह मिळून मुलाला राणी ऊर्फ शबनम खान (वय २६) नावाच्या महिलेला १ लाख ५ हजार रुपयांत विकल्याची कबुली बालकाच्या आईने दिली.

​दलालांची साखळी आणि ‘आयव्हीएफ’ कनेक्शन

​तपासात या गुन्ह्यात आंतरराज्य साखळी कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले. शबनमनंतर दीपक मोरे, झैदा खान, प्रिया बोराडे आणि आकाश बोराडे या आरोपींमार्फत हे बाळ कर्नाटकात नेण्यात आले. यातील काही आरोपींचे एका ‘आयव्हीएफ’ (IVF) केंद्राशी लागेबांधे असल्याचे समोर आले आहे. या टोळीने कर्नाटकात नेऊन हे बाळ रामास्वामी ऊर्फ अण्णा (५२) याला ३ लाख रुपयांत विकले. त्यानंतर अण्णाने तामिळनाडूतील कण्णन विरिया ऊर्फ राजू (३९) आणि त्याची पत्नी प्रिया (३८) यांना ते ४ लाख ८० हजार रुपयांना विकले. हे दांपत्य गेल्या १६ वर्षांपासून अपत्यहीन होते.

हे ही वाचा:

राजकारणाला सापशिडीचा डाव का म्हणतात? हे आहे उत्तर…

चाकणचे खड्डे बुजणार; ३१ ऑगस्टपर्यंत रस्ते दुरुस्तीचे आदेश

बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात एकमेव बदल

काझीरंगाभोवतीचा १० किमी संवर्धन पट्टा घटवण्याचा सरकारचा प्रस्ताव

​कर्नाटक ते तामिळनाडू पाठलाग

​बालकाला बसने कर्नाटकमार्गे तामिळनाडूत नेण्यात आले होते. धारावी पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटकात जाऊन ‘अण्णा’ला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने तामिळनाडू गाठून बाळाची सुरक्षित सुटका केली. ​या प्रकरणी बाल न्याय कायद्यांतर्गत (Juvenile Justice Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून, टोळीने अशा प्रकारे आणखी बालकांची विक्री केली आहे का, यादृष्टीने पोलीस अधिक तपास करत आहेत.

Exit mobile version