मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पोस्टमुळे पोलिस सतर्क

पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा धोका, पोस्टमुळे पोलिस सतर्क

सोशल मीडियावर मुंबईवर ९ ते १८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता व्यक्त करणारी पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या पोस्टमध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांकडून मोठा हल्ला होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. या दाव्यामागे कोणतेही ठोस इनपुट आहे की केवळ भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न, याचा आता सायबर यंत्रणांकडून शोध घेतला जात आहे.

माहितीनुसार, ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील @AstroPrashnath9 या अकाउंटवरून इंग्रजी भाषेत ही पोस्ट करण्यात आली होती. त्यात ऑगस्ट २०२६ मध्ये भारताने विशेष सतर्क राहण्याची गरज असून ९ ते १८ ऑगस्ट हा अत्यंत संवेदनशील कालावधी ठरू शकतो. या काळात पाकिस्तानी दहशतवादी मोठा हल्ला करू शकतात, असा उल्लेख करण्यात आला होता. ही पोस्ट काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली.

त्यानंतर @tstark86v1 या एक्स हँडलने ही पोस्ट मुंबई पोलिसांना टॅग करून त्यांच्या निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाची दखल घेत संबंधित पोस्टची पडताळणी सुरू केली. पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची ओळख, तिच्याकडे अशा प्रकारची संवेदनशील माहिती कशी आली आणि या पोस्टमागे कोणताही गैरप्रकार किंवा कट आहे का, याचा तपास सायबर पोलिसांकडून केला जात आहे.

हे ही वाचा:

मेहबुबा मुफ्तींनी धरला तिरंगा उलटा

ई-२० वादातील गडकरींशी संबंधित डीपफेक, बनावट पोस्ट हटवा

‘मेटा’कुटीला…माफी मागा नाहीतर कारवाई

तीन महिन्यात १००० पेक्षा अधिक जहाजांनी ओलांडली होर्मुझ

व्हायरल पोस्टचे मूळ शोधण्यासाठी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेने तपास सुरू केला आहे. संबंधित सोशल मीडिया अकाउंटची तांत्रिक माहिती, त्याचे लोकेशन, पोस्टचा उद्देश तसेच त्यामागे कोणती संघटित टोळी किंवा दहशतवादी नेटवर्क कार्यरत आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, सोशल मीडियावरील अशा पोस्टमुळे नागरिकांमध्ये अनावश्यक भीती आणि गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोणतीही अपुष्ट माहिती पडताळणी न करता पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version