भुसावळमध्ये कॉनव्हेंट शाळेत हिंदू मुलांना हिजाब, स्कार्फ घालून मशिदीची सहल कशाला?

या शाळांना मिशनरी संस्थांना डाव्या पुरोगामी परिसंस्था आणि पुरोगाम्यांचा पाठिंबा

भुसावळमध्ये कॉनव्हेंट शाळेत हिंदू मुलांना हिजाब, स्कार्फ घालून मशिदीची सहल कशाला?
भुसावळमधील १५० वर्षे जुन्या सेंट अलॉयसियस हायस्कूलने नुकतीच नववीच्या स्काउट आणि गाईड विद्यार्थ्यांची १०० रुपये शुल्क घेऊन ‘धार्मिक सलोखा सहल’ आयोजित केली. या सहलीत मुलींना चेहऱ्यावर हिजाबप्रमाणे स्कार्फ बांधून आणि मुलांना डोक्यावर रुमाल बांधून एका मशिदीत नेण्यात आले. त्यामुळे संतापलेल्या हिंदुत्ववादी संघटना आणि पालकांनी शाळेवर मोर्चा काढून प्राचार्या सिस्टर शिला आणि शिक्षक अमोल दंदाले यांना याचा जाब विचारला. ही घटना मिशनरी चालवत असलेल्या शाळांमध्ये संस्कारक्षम वयातील विद्यार्थ्यांना हिंदुविरोधी प्रचाराचे कसे लक्ष्य केले जाते याचे ताजे उदाहरण आहे.
जेसुइट संघटनेच्या एका उद्गारात ते म्हणतात, “तुमची मूले तुम्ही मला सात वर्षांची झाल्यावर द्या आणि मी तुम्हाला संपूर्णपणे आज्ञाधारक आणि निष्ठावान पुरुष देईन.” ही जेसुइट संघटनेची घोषणा धार्मिक शिक्षणाच्या माध्यमातून बालमनावर दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पाडण्याचे महत्त्व अधोरेखित करते. लहान वयात दिले जाणारे शिक्षण आणि संस्कार व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव टाकतात. भारतात ख्रिश्चन मिशनरी शाळांमध्ये हिंदू विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानावर आणि सांस्कृतिक ओळखीवर नकारात्मक परिणाम करणारे प्रकार वारंवार घडण्यामागे देखील हेच तत्व आहे. संस्कारक्षम वयात आलेल्या अशा अनुभवांमुळे विद्यार्थ्यांना न्यूनगंड (inferiority complex) ग्रासतो. या शाळांमध्ये ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वांना वैज्ञानिक आणि तार्किक म्हणून सादर केले जाते, तर हिंदू परंपरा तर्कहीन किंवा अंधश्रद्धा असल्याचे भासवले जाते.
 

कोवळ्या वयातील मुलांमुलींना दुसऱ्या धर्माची प्रथा म्हणून सक्तीने हिजाब बांधतात त्या पद्धतीने स्कार्फ किंवा रुमाल बांधण्यास भाग पाडणे त्यांच्या सांस्कृतिक ओळखीला डावलण्यासारखं आहे. पालक शाळेच्या अभ्यासक्रमावर विश्वास ठेवतात. शाळा मुलांचे व्यक्तिमत्व घडवण्यासाठीच विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करेल अशी अपेक्षा आणि आशा पालकांची असते. पण शाळेने एका बाजूला मुलामुलींना कपाळावर कुंकू न लावता मंदिरात न्यायचे आणि त्याच सहलीमध्ये सलोख्याच्या नावाखाली दुसऱ्या धर्माच्या प्रथा पाळायला लावण्याची सक्ती करणे या विरोधाभासाबाबत शंका उपस्थित केली जाणे स्वाभाविकच आहे. कॉन्व्हेंट शाळांतून अनेकदा संस्कारक्षम वयातील मुलांच्या मनावर ‘सद्भावना’ शिकवण्याच्या नावाखाली हिंदू धर्माच्या परंपरा दुय्यम वाटाव्यात असे वातावरण निर्माण केले जाते आणि ख्रिश्चन धर्माची श्रेष्ठता बिंबवली जाते.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये बॉम्बस्फोट; फ्रंटियर कॉर्प्स मुख्यालयाजवळ गोळीबार

ऑपरेशन सिंदूर हे प्रमाण

देवनार-मानखुर्द जन्म प्रमाणपत्र घोटाळा: १०३ जणांना बोगस जन्म प्रमाणपत्र वितरित

चिराग पासवान यांनी प्रशांत किशोर यांची केली केजरीवाल यांच्याशी तुलना

शालेय उपक्रमांचा वापर हिंदू ओळख पुसण्यासाठी करणे. हिंदू विद्यार्थ्यांना कुंकू, टिकली, मेंदी, कलावा किंवा टिळा यासारख्या त्यांच्या धार्मिक प्रतीकांचा त्याग करण्याची सक्ती करणे. तर याच विद्यार्थ्यांना बायबल वाचन, ख्रिस्ती प्रार्थना म्हणणे किंवा ख्रिसमस साजरा करणे यासारख्या नियम त्यांच्यावर लादणे हे मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळांमध्ये सर्रास घडते. अश्या काही घटनांची यादी पुढीलप्रमाणे:-

घटना १: कर्नाटकातील क्लॅरेन्स हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना बायबल घेऊन येणे अनिवार्य केले गेले.

घटना २: छत्तीसगडमध्ये एका शाळेत साडेतीन वर्षांच्या मुलीला “राधे राधे” म्हणल्याबद्दल मारहाण करून चिकटपट्टीने तोंड बंद केले.

घटना ३: कलावा घातल्याबद्दल बिहारमध्ये ३० विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मारहाण.

घटना ४: चेन्नईमध्ये ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक.

घटना ५: मध्य प्रदेशमध्ये एन.सी.पी.सी.आर.ने ख्रिश्चन वसतिगृहातून चालणारे धर्मांतर रॅकेट उघड केले.

घटना ६: तामिळनाडूमध्ये क्रीडा प्रशिक्षकाविरुद्ध लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर ख्रिश्चन शाळेला नोटीस.

घटना ७: त्रिपुरामध्ये धर्मांतरास विरोध करणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा छळामुळे मृत्यू.

घटना ८: आंध्र प्रदेशात शिक्षकाकडून विद्यार्थ्यांवर बायबल वाचण्याची सक्ती.

मिशनऱ्यांनी चालवलेल्या शाळांमध्ये हिंदू परंपरा मागास ठरवून ख्रिश्चन धर्म श्रेष्ठ असल्याचे विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवले जाते हेच वरील घटनांमधून सिद्ध होतो. याशिवाय मुलांचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या नावाखाली हिंदू मान्यता चुकीच्या असल्याचे त्यांच्या मनावर ठसवणे, इतिहासाचे विकृतीकरण करणे यासारखे प्रकार करून विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या धार्मिक ओळखीबाबत न्यूनगंड आणि तिरस्कार निर्माण केला जातो.

२०२० च्या सरकारी आकडेवारीनुसार देशात एकूण ५४,९३७ ख्रिश्चन शाळा आहेत. या शाळा तथाकथित नैतिक आणि सांस्कृतिक शिक्षणाच्या नावाखाली ख्रिश्चन धर्माचा प्रचार करतात. या शाळांना मिशनरी संस्थांना डाव्या पुरोगामी परिसंस्था आणि पुरोगाम्यांचा पाठिंबा मिळतो. म्हणूनच, शालेय व्यवस्थापनाच्या अन्यायाला आळा घालण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे. असे संघटित प्रयत्नच या असमतोलाला सामोरे जाण्यासाठी मदत करू शकतात.

Exit mobile version