राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलताना रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी हिंदुत्व या शब्दाची व्यापक व्याख्या काय आहे, हे समजावून सांगितले. अनेक क्षेत्रातील नामवंत या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या माध्यमातून सर्व स्तराच्या लोकांपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका पोहोचावी हा हेतू होता.
संघाचा १०० वर्षांचा प्रवास या विषयावरील भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितले की भारतात राहणारा प्रत्येक व्यक्ती “हिंदू” आहे. हा शब्द धार्मिक ओळखीपेक्षा भारतीय संस्कृतीच्या मूल्यांचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोहनराव भागवत यांनी भारताच्या फाळणीचा संदर्भ देत सांगितले की ही फाळणी “हिंदू भाव” किंवा हिंदू भावनेच्या क्षयामुळे झाली. धर्माच्या आधारावर फाळणी झाली. आम्ही सर्व धर्मांचा सन्मान करतो, कारण आम्ही हिंदू आहोत,” असे ते म्हणाले. मतभेद आणि कधीतरी तणाव असूनही भारत एकसंध राहिला आहे, याचे कारण त्याची सांस्कृतिक मूल्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, हिंदुत्व स्वीकारल्याने कोणालाही आपला धर्म, भाषा किंवा सांस्कृतिक परंपरा सोडाव्या लागत नाहीत. हिंदुत्व स्वीकारल्याने तुम्ही काहीही गमावत नाही, ना धार्मिक आचार, ना भाषा. हिंदुत्व म्हणजे सुरक्षिततेची हमी आहे.
या कार्यक्रमात बोलताना भागवत म्हणाले की हिंदू हे नाम नाही तर विशेषण आहे, जे भारताच्या सांस्कृतिक स्वभावाचे वर्णन करते. तुम्ही भारतीय असाल, तर हा स्वभाव तुमच्यात आपोआप असतो,” असे ते म्हणाले. तसेच मुस्लिम आणि ख्रिश्चन हे देशाचा अविभाज्य भाग असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले. भारताचे जागतिक नेतृत्व भाषणांमुळे नव्हे, तर उदाहरणामुळे घडेल.
हे ही वाचा:
बाप्पाच्या आशीर्वादाने टी२० मोहिमेचा श्रीगणेशा!
नेदरलँड्ने पाकड्यांना घाम फोडला!
भागवत यांनी देशातील हिंदू चार व्यापक गटांमध्ये विभागल्याचे सांगितले. ते म्हणाले की, पहिला गट म्हणजे जे अभिमानाने आपली हिंदू ओळख जाहीरपणे सांगतात. दुसरा गट असा आहे की जे स्वतःला हिंदू मान्य करतात, पण त्यात काही विशेष असल्याचे मानत नाहीत. तिसरा गट हा अशा लोकांचा आहे, जे आपली ओळख खासगी पातळीवरच व्यक्त करणे पसंत करतात. चौथा गट, त्यांच्या मते, असा आहे की ज्यांनी आपली हिंदू ओळख विसरली आहे किंवा ज्यांना ती विसरायला लावण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले की, श्रद्धा, आहार किंवा भाषा वेगवेगळ्या असू शकतात, पण समाज आणि राष्ट्र म्हणून आपण एकच आहोत. आम्ही याला हिंदुत्व म्हणतो; तुम्ही त्याला भारतीयता म्हणू शकता,” असे सांगत त्यांनी हिंदू–मुस्लिम ऐक्य हा शब्दप्रयोग दिशाभूल करणारा असल्याचे मत व्यक्त केले, कारण ऐक्य म्हणजे आधी विभाजन गृहीत धरले जाते. थेट संवादावर भर देत भागवत म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे प्रचाराच्या चष्म्यातून पाहण्याऐवजी प्रत्यक्ष संवादातून समजून घ्यायला हवे.







