शरिया कायद्यांच्या आधारे लादलेले जाचक नियम
१९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर आयतोल्लाह रुहोल्लाह खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील ईराण सरकारने महिलांच्या हक्कांवर कठोर निर्बंध लादले. पूर्वीच्या पहलवी राजवटीत महिलांना मतदानाचा अधिकार, शिक्षण आणि नोकरीच्या संधी होत्या. आयतोल्लाह खोमेनींच्या इस्लामी राजवटीने शरिया कायद्यांचा आधार घेऊन महिलांचे हे सर्व अधिकार काढून घेतले. त्यांना घराबाहेर पडण्यासाठी सोबत पतीला घेऊन जाणे अनिवार्य केले.
जी स्त्री घरगुती वस्तूंच्या खरेदीला एकटी घराबाहेर पडू शकत नाही, ती नोकरीसाठी घराबाहेर कशी पडू शकेल? शरिया कायद्यांनुसार, महिलांचे कपडे, लग्न, घटस्फोट, वारसा आणि सार्वजनिक जीवनावर आत्यंतिक नियंत्रण ठेवले गेले. महिलांना हिजाब घालणे अनिवार्य केले गेले. त्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य नेस्तनाबूत केले गेले. खोमेनींनी १९७८ मध्ये म्हटले होते, “इस्लाम महिलांच्या सन्मानाची रक्षा करतो. तो तिला गंभीर आणि कार्यक्षम व्यक्ती बनवतो.” पण क्रांतीनंतर त्यांनी हेच धोरण उलटवले आणि महिलांना ‘पाश्चिमात्य नैतिक भ्रष्टाचारापासून वाचवण्यासाठी’ इस्लामी शरिया कायदा ईराण मध्ये अमलात आणायला सुरुवात केली.
१९८३ च्या इस्लामी दंड संहितेनुसार, हिजाब न घालणाऱ्या महिलांना ७४ कोरड्याच्या फटक्यांची शिक्षा होई. लग्नाच्या बाबतीत, मुलींचे किमान वय १३ वर्षे ठेवले गेले, ज्यात १० वर्षांच्या मुलींचे लग्नही शक्य होते. पुरुषांना चार कायमस्वरूपी पत्नी ठेवण्याची मुभा दिली गेली. तर महिलांना घटस्फोटाचा अधिकारही बऱ्याच किचकट पद्धतीने विशिष्ट परिस्थितीतच मिळत असे. वारशाच्या बाबतीत, महिलांवर अन्याय केला गेला. पुरुषांना पत्नीला काम करण्यापासून रोखण्याचा अधिकार होता. दूरच्या किंवा परदेश प्रवासासाठी पतीच्या परवानगीपत्राची आवश्यकता इतर कागदपत्रांसोबत जोडणे अनिवार्य केले होते. ‘इस्लामी मूल्ये’ जोपासण्यासाठी अश्या अनेक अटी आणि शिक्षांच्या ओझ्याखाली ईराणी महिलांना दाबून ठेवले गेले. त्यांचे सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य त्यांच्यापासून हिसकावून घेतले गेले.
हे ही वाचा:
नीतीश कुमार यांचा मुलगा निशांत राजकारणात
ई-कॉमर्स क्षेत्राला मोठा धक्का!
होर्मुझ सामुद्रधुनी: जगाच्या ऊर्जा पुरवठ्याची जीवनरेखा
राष्ट्रपती मुर्मू यांच्या स्वागताला ममता गैरहजर, मोदींची टीका
खोमेनी शासनाने शरियाला राजकीय शस्त्र म्हणून वापरले. ह्या कार्यपद्धतीत धार्मिक कर्तव्य आणि ‘मोरॅलिटी पोलिस’ (गाइडन्स पॅट्रोल) चा वापर करून महिलांना नियंत्रित करण्याचे भयानक षडयंत्र सरकारी व्यवस्था वापरून रचले गेले. १९७९ मध्ये १ लाख ईराणी महिलांनी हिजाबविरोधात आंदोलन केले होते. प्रसारमाध्यमे, पोलिस यंत्रणा वापरून जनतेची प्रामुख्याने महिलांची मुस्कटदाबी करून ते राजरोसपणे दाबले गेले. १९८० पर्यंत शासकीय परिसरात हिजाब अनिवार्य केला गेला. विरोध करणाऱ्या महिलांना ‘इस्लामविरोधी’ ठरवून तुरुंगात डांबले गेले. घरगुती हिंसेला कायद्याने संरक्षण, व्यभिचारासाठी दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा, आणि १९८८ च्या सामूहिक हत्याकांडात (३,०००-५,००० कैदी मारले, ज्यात १,००० हुन महिलांचा समावेश होता) शरियाचा वापर करून राजकीय विरोध खोमेनी सरकारने दाबला.
ईराण मध्ये नैतिकता पोलिस (मोरॅलिटी पोलिस) म्हणजे गश्त-ए-एरशाद नावाचे एक विशेष पोलिस दल असते. यात बहुतेक महिला पोलीस असतात, या पोलीस इस्लामी शरिया कायद्यानुसार महिलांच्या कपड्यांचे (विशेषतः हिजाब) आणि सार्वजनिक वर्तनाचे कठोरपणे पालन केले जात आहे कि नाही यावर बारीक लक्ष ठेवून असतात. महिलांना हिजाब योग्य प्रकारे न घातल्याचे किंवा ‘अनुचित’ कपडे घातल्याचे कारण सांगून अटक करणे, मारहाण करणे किंवा दंड आकारणे, किंवा चाबकाच्या फटाक्यांची शिक्षा देतात.
२०२२ मध्ये महसा अमिनी या २२ वर्षीय मुलीला हिजाब नियम उल्लंघनासाठी अटक केल्यानंतर तिचा तुरुंगात मृत्यू झाल्याने देशव्यापी आंदोलने झाली.
नैतिकता पोलिसांनी महिलांना थोबाडावणे, बॅटनने मारणे आणि कैद करणे यासारखे अत्याचार राजरोसपणे गेली ४८ वर्षे केले आहेत. २०२२-२३ मध्ये सरकारने हे दल बंद केल्याचे सांगितले, पण प्रत्यक्षात काही ठिकाणी ते सक्रिय राहिले. ईराणी महिला खामेनी च्या मृत्यूनंतर इतक्या का आनंदात आहेत याचा अंदाज आपल्याला सहज आला असेल.
खोमेनी काळातील अत्याचारांची उदाहरणे
१. अनिवार्य हिजाब आणि शिक्षा: १९७९-१९८९ दरम्यान हजारो महिलांना नैतिकता पोलिसांनी अटक, मारहाण केली; ७४ फटके मारण्याची शिक्षा हजारो-लाखो महिलांना सहन करावी लागली आहे.
२. तुरुंगातील लैंगिक हिंसाचार: १९८० च्या दशकात राजकीय कैद्यांवर (महिलांवर) बलात्कार झाले. फाशीपूर्वी कुमारी मुलींवर ‘इस्लामी पाप टाळण्यासाठी’ बलात्कार केले गेले. १९८८ च्या हत्याकांडात महिलांना अकल्पनीय लैंगिक हिंसेला सामोरे जावे लागले. या सामूहिक हत्याकांडात ३,०००-५,००० राजकीय कैदी मारले गेले. यात १,००० हुन अधिक महिला कैद्यांचा समावेश होता.
३. दगडांनी ठेचून मारणे: १९८०-२००० पर्यंत १०० पेक्षा अधिक लोकांना दगडांनी ठेचून मारण्याची शिक्षा ठोठवण्यात आली. यात महिला कैद्यांची संख्या जास्त होती. आणि ही शिक्षा व्यभिचार केला किंवा लग्नबाह्य, इस्लामच्या शरीरसंबंधाच्या नियमांना उल्लंघून प्रेमसंबंध ठेवले यासाठी देण्यात आली.
४.ऑनर किलिंग किंवा कौटुंबिक सन्मानासाठी हत्याकांड: ईराण मध्ये जे खुनाचे गुन्हे केले जातात त्या हत्यांपैकी सुमारे २०% ऑनर किलिंग असतात. कुटुंबात होणाऱ्या भांडणांमुळे ज्या हत्या केल्या जातात त्या हत्यांपैकी ५०% हत्या ऑनर किलिंग प्रकारात मोडतात. या खुनांमध्ये बहुतेक बळी स्त्रियाच असतात. अश्या खुनांना इराणमध्ये शरिया कायद्याने संरक्षण दिले आहे. शरियाच्या कलमांनुसार (जसे कलम ३०१) वडील किंवा पुरुष नातेवाइकांना मुली/पत्नी मारण्यासाठी ‘प्रतिशोध न्याय’ (क्विसास) मधून सूट मिळते किंवा कमी शिक्षा होते. या किळसवाण्या क्रूर ढोंगीपणाला काय म्हणावे?
अयातुल्ला खोमेनीने जे तंत्र अवलंबले त्याचाच वापर पुढे अली खामेनीने केला. त्याने तर हिजाब अनिवार्यता कायम ठेवलीच, वर २०२४ मध्ये नवीन कडक कायदा करून हिजाब न घालणाऱ्यांना फाशी, तुरुंगवास किंवा दंड अश्या शिक्षा आणल्या. ९ वर्षांच्या मुलीचा बालविवाह कायदेशीर केला. वैवाहिक बलात्कार गुन्हा सदरात गृहीत धरला जाणार नाही असा फतवा तर काढलाच त्यावर काडी म्हणजे त्याने घरगुती हिंसेला कायदेशीर संरक्षण मिळवून दिले. २०२२ च्या ‘महिला जीवन स्वातंत्र्य’ (Woman Life Freedom) आंदोलनानंतर नैतिकता पोलिसांची हिंसा प्रचंड वाढली; महसा अमिनीच्या मृत्यूने (हिजाब उल्लंघनासाठी मारली गेली) आंदोलन पेटले.
गेल्या काही वर्षांत ईराणी महिलांवर इस्लामच्या नावावर केले गेलेल्या क्रूर असह्य अत्याचारांची उदाहरणे:
१. फेमिसाईड आणि सन्मान हत्याकांड: २०२४ मध्ये पहिल्या सहा महिन्यांत ९३ स्त्रियांची हत्या झाल्याचे आकडेवारी सांगते. शरियाच्या कलम ३०१ नुसार वडीलांना मुलीला मारण्यासाठी सूट दिली गेली आहे. उदाहरणार्थ, २७ वर्षीय गझालेह हुदौदी (२०२४) हिने कुटुंबाने ठरवलेले लग्न नाकारले. केवळ या एका कारणावरून घरातल्या लोकांनी तिला जिवंत जाळले. इस्लाममध्ये सुधारणा होणे शक्यच नाही का? १७ वर्षीय मोबिना झैनिवंद (२०२४) हिला सुद्धा तिच्या पित्याने मारून टाकले. २०२४-२०२५ मध्ये १८०पेक्षा जास्त सन्मान हत्याकांड ईराण मध्ये पोलीस अहवालात लिहिल्या गेली आहेत.
२. बलात्कार, लैंगिक हिंसा, ऍसिड हल्ले: वैवाहिक बलात्कार हा गुन्हा नाही असे ह्या राजवटीत मानले गेले. २०२४-२०२५ मध्ये ६३+ अशी प्रकाराने उजेडात आली. २०२२ च्या आंदोलनात नैतिकता पोलिसांनी लैंगिक त्रास दिल्याचे समोर आले, महसा अमिनी तर तुरुंगातच मारली गेली. पत्रकार मंसरुह गदिरी (२०२४) हिला तिच्या पतीने बलात्कार करून मारले. ‘अनुचित कपडे’ घालणे तसेच लग्नाला नकार दिला म्हणून ऍसिड हल्ले करण्याचे प्रमाणही ईराण मध्ये बरेच आहे.
३. महिलांना फाशी: २०२२-२०२४ मध्ये १,४००+ लोकांना फाशी दिली गेली. यापैकी ७०% फाशीच्या शिक्षा हत्येसाठी दिल्या गेल्या. या प्रकरणांपैकी ७०% महिलांनी हिंसा किंवा बलात्काराच्या प्रतिक्रियेत शोषकाची हत्या केली होती. म्हणजे एखाद्या स्त्रीवर अत्याचार होत असेल तर तिने एक तर जीभ दातात धरून श्वास रोखून अत्याचार निमूटपणे सहन करावा किंवा त्या अत्याचाराचा बळी पडावे, हेच नैतिकदृष्ट्या योग्य आहे, अशी इस्लामिक कायद्यात धारणा आहे का?
५. प्रदर्शनांविरोधातील हिंसा: २०२२ मध्ये सरकारविरोधात झालेल्या आंदोलनात ५५१ पेक्षा जास्त लोक मारले गेले. ७,००० हुन अधिक आंदोलकांना अटक केली गेली. महसा अमिनी आणि अर्मिता गेरावंद अश्या आंदोलक स्त्रियांचा आवाज दाबून टाकण्यासाठी त्यांना तुरुंगातच मारून टाकण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाने ‘महिलांविरोधातील गुन्हे’ अशा शब्दात या प्रकाराची निर्भर्त्सना केली आहे.
हे अत्याचार इस्लामी शरिया कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी सुरु आहेत. गेल्या ४८ वर्षांत महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यात ४०-६०% वाढ झाली, कारण इस्लामी न्यायव्यवस्था अपराधींना संरक्षण देते, असा आरोप महिलांकडून वारंवार झाला असल्याचे विविध लेखांमधून आणि अहवालांमधून समोर येते. महिलांच्या संघर्षाने (जसे महसा अमिनीच्या मृत्यूनंतरचे आंदोलन) मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढवली. लोकांना अत्याचाराविरोधात आवाज उठवण्याचे बळ मिळाले. अमेरिका आणि इस्त्राईलने केलेल्या हल्ल्यात अली खामेनी मारला गेल्यानंतर ईराणी जनतेने आणि विशेषतः महिलांनी जो जल्लोष केला त्यातून ध्वनित होणारा अर्थ हा होता कि खामेनीला सामान्यजन क्रूर नरराक्षस समजत होते.
ईराण मध्ये इस्लामविरोधाची प्रचंड लाट आहे. तिथे ७५ हजार मशिदींपैकी ५० हजार मशिदी बंद पडल्याच्या बातम्या आहेत. लाखो लोक आपला पूर्वधर्म झोरॅष्ट्रियन धर्माचे पालन करू लागले आहेत. ईराण मध्ये आता कायमस्वरूपी बदलाची चिन्हे दिसू लागली आहेत. परंतु त्यामागे लाखो महिलांच्या आर्त किंकाळ्या, लाखो अत्याचारांच्या कथा काळाच्या पडद्याआड मागे पडल्या आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून त्या कथा, त्यामागचे षडयंत्र, त्यामागच्या शक्ती, आणि यंत्रणांचा अभ्यास करणे हे भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने जगभरातील महिलांनी ईराण मध्ये समोर आलेले इस्लामचे क्रूर महिलाविरोधी रूप लक्षात ठेवून स्वतःचा विवेक जपणे गरजेचे आहे.







