26 C
Mumbai
Monday, December 15, 2025
घरसंपादकीयनेत्याचा ‘वसंतदादा’ करत नाहीत, त्यांना अमित शाह म्हणतात...

नेत्याचा ‘वसंतदादा’ करत नाहीत, त्यांना अमित शाह म्हणतात…

अनेक यशांसाठी इतिहास अमित शहा यांची नोंद घेईल, पवारांची कशासाठी नोंद घेईल?

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री यांनी केलेली तिखट जाळ टीका राष्ट्रवादी शपचे नेते शरद पवार यांना प्रचंड बोचलेली दिसते. गृहमंत्री शहा हे काय नोंद घेण्यासारखी व्यक्ति नाही, असे सांगत पवारांना त्यांच्यावर अख्खी पत्रकार परिषद खर्च केली. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात निष्ठेची कसोटी पाहाणारे क्षण येतात. जेव्हा पवारांच्या आयुष्यात हा क्षण आला तेव्हा ते खुर्चीच्या मोहात पडले. अमित शहा यांनी मात्र निष्ठेसाठी तुरुंगवास भोगला. अमित शहा यांना सुद्धा मोदींचा वसंतदादा करता
आला असता. परंतु त्यांनी गद्दारी केली नाही.

महाराष्ट्राच्या राजकारणात विश्वासघाताचे पर्व सुरू करण्याचा मान शरद पवारांना जातो. महाराष्ट्रातील पोराबाळांना सुद्धा हे ठाऊक आहे. इतकी वर्षे झाली तरी ही पवारांची दुखरी जखम आहे. त्या जखमेवर शाह यांनी फक्त बोट ठेवले नाही तर
थोडे मीठ आणि लाल तिखटही चोळले. त्यामुळे पवारांचा भडका उडाला तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. ‘देशात अनेक गृहमंत्री झाले, पण कुणालाही तडीपार केले नाही’, या शब्दात शरद पवार यांनी अमित शहा यांचा हिशोब चुकता करण्याचा प्रयत्न केला. गुजरातेतील कुख्यात सोहराबुद्दीन एन्काऊंटर झाले तेव्हा अमित शहा गृहमंत्री होते. या एन्काऊंटर प्रकरणी सीबीआयने अमित शहा यांना जुलै २०१० मध्ये अटक केली होती. तीन महिने तुरुंगवास भोगल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. शाह या प्रकरणातील साक्षीदारांना प्रभावित करू शकतील, असा युक्तिवाद सीबीआयच्या वकीलांनी केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना गुजरात सोडण्याचे आदेश दिले.

पवारांनी जे आरोप केले, त्याची पार्श्वभूमी ही अशी आहे. ज्या सोहराबुद्दीन शेख एन्काऊटर प्रकरणावरून शाह यांना तडीपार असल्याचे टोमणे मारले जातात, त्याच्यावर माफीया दाऊद इब्राहीम आणि लष्कर ए तोयबाशी संबंध असल्याचा
ठपका होता. हा हिस्ट्री शीटर होता. पाच राज्यात वॉण्टेड होता. सोहराबुद्दीनच्या घरावर मारलेल्या छाप्यात त्याच्या बावडीत ४० एके ४७, १०० ग्रेनेड आणि मोठ्या प्रमाणात दारुगोळा सापडला होता. गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र
मोदी यांना अडकवण्यासाठी यूपीएच्या सरकारने सोहोराबुद्दीन प्रकरणाचा सापळा रचला होता, अशा अनेक बाबी पुढे उघड झाल्या. शरद पवारांना जसा इशरत जहॉंचा पुळका आला होता, तसाच त्या काळी काँग्रेसला या सोहराबुद्दीनचा पुळका आला होता.

पवार यांचे राजकारण आणि शाह यांचे राजकारण इथेच वेगळे ठरते. शरद पवारांनी सत्तेसाठी वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि अमित शाह यांना एक षडयंत्र रचून तुरुंगात डांबल्यानंतरही त्यांनी मोदींशी प्रतारणा
केली नाही. मोदी हे शाह यांचे वसंतदादा होते. शाह यांनी मोदींचे नाव घ्यावे यासाठी त्यांच्यावर प्रचंड मोठा दबाव होता. अनेक मुलाखतीत शाह यांनी ही बाब उघड केलेली आहे. यूपीए सरकार आणि सोनिया गांधी यांना कळून चुकले होते
की, त्यांच्या सत्तेला आव्हान निर्माण करू शकेल असा एकमेव नेता देशात आहे आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी. त्यामुळे योग्य वेळी त्यांचा काटा काढण्यासाठी सोहराबुद्दीन प्रकरण तापवण्यात येत होते. शाह यांनी तुरुंगवास भोगला, तडीपारी
भोगली, परंतु त्यांच्या निष्ठेला तडा गेला नाही.

सोहराबुद्दी प्रकरणात तुरुंगवास भोगल्यानंतर दोन वर्षे घरापासून दूर राहावे लागल्यानंतरही अमित शहा यांच्या मनोधैर्याचा बुरुज ढासळलेला नव्हता. २०१२ मध्ये जेव्हा ते गुजरातमध्ये परतले तेव्हा त्यांनी मीडियासमोर विरोधकांना ठणकावून सांगितले होते. मेरा पानी उतरता देख, किनारे पर घर मत बसा लेना मै समुंदर हू लौट के फिर आऊंगा…योगायोग पाहा २०१९ मध्ये ठाकरे-पवारांनी दगाबाजीने सत्ता स्थापन केल्यानंतर विरोधकांना आव्हान देताना देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचे तेच शब्द पुन्हा वापरले. मै समुंदर हू लौट के फिर आऊंगा… मोदींना शाह यांच्या निष्ठेची किंमत ठाऊक होती. म्हणून आज शाह मोदींचे विश्वासपात्र आहेत. पवारांच्या राजकारणाचा या निष्ठेशी कधीही संबंध राहिला नाही. कारण त्यांचे राजकारण निष्ठेवर नाही तर दगाबाजीवर आधारित होते.

हे ही वाचा:

आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा…मोदींनी महायुतीच्या आमदारांना दिला कानमंत्र!

चुकीच्या दाव्यानंतर ‘मेटा’कुटीला येत मागितली भारताची माफी

छत्रपती शिवरायांनी नौसेनेला ‘नवे सामर्थ्य, व्हिजन दिले’

जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’

बाकी अमित शहा यांची नोंद घेण्याची गरज नाही, हे पवार बोलले ते योग्यच. १९७८ मध्ये पवार मुख्यमंत्री होते तेव्हा शाह कुठे होते हा प्रश्नही योग्य आहे. हा प्रश्न पवारांना चोवीसाव्या वर्षी पडला असता तर त्यावेळी अमित शहा यांचे या जगात पदार्पणही झाले नव्हते. हा प्रश्न पवारांना फडणवीसांबद्दलही पडला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना उत्तर प्रदेश सारख्या खडतर राज्यात मिळवलेली सत्ता, ३७० कलम रद्द करण्यासारख्या अनेक यशांसाठी इतिहास अमित शहा यांची नोंद घेईलच. पवार साहेब तुमची नोंद घेणेही अपरिहार्य आहे.

१९७८ मध्ये खुपसलेल्या खंजीरासाठी, लवासासाठी, वाजपेयींचे सरकार पाडण्यासाठी, तेराव्या ब़ॉम्बस्फोटासाठी इतिहास तुम्हालाही कधी विसरणार नाही. एक्त एक गोष्ट लक्षात असू द्या, २०१० मध्ये अमित शाहा यांना अटक झाली तेव्हा पी.चिदंबरम गृहमंत्री होते. २०१९ मध्ये चिदंबरम यांना अटक झाली तेव्हा अमित शहा गृहमंत्री होते आणि आजही तेच गृहमंत्री आहेत.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा