ऑपरेशन सिंदूरच्या काळात काँग्रेस पक्ष केंद्र सरकारकडे सतत किती विमाने पडली, याचा हिशोब मागत होता. आपल्याच सेनादलांवर अविश्वास व्यक्त करत होता. काँग्रेसचे नेते पाकिस्तानच्या नरेटीव्ह वॉरला पोशक अशी विधाने करत होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फाजील विधानांची री ओढत होते. थोडक्यात पाकिस्तानची दलाली करत होते. भारतात बसून पाकिस्तानी हस्तकाची भूमिका बजावत होते. इराण युद्धाच्या काळातही हे सुरू आहे. अफवांचा बाजार गरम करत, काँग्रेसने ही परंपरा जारी ठेवली आहे. दुसऱ्या बाजूला पाकिस्तानने इराण युद्धाच्या निमित्ताने अमेरिकेची दलाली करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री डॉ.एस.जयशंकर यांच्या जोडगोळीच्या तिखट जाळे परराष्ट्र धोरणाने या दलालांचा बाजार उठवला आहे.
इराण युद्धामुळे सगळे जग अडचणीत आले आहे. भारत त्याला अपवाद असण्याचे काहीच कारण नाही. अशा परिस्थितीत सकारात्मक भूमिका घेऊन देशवासियांचे मनोधैर्य वाढवण्याची भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाने घेणे अपेक्षित आहे. दुर्दैवाने काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी अफवांचा बाजार गरम करून जनतेमध्ये घबराट निर्माण करण्याचे धोरण स्वीकारले. एखाद्याच्या घरी मृत्यू झाल्यावर शोक होण्यापेक्षा तेराव्याचे जेवण मिळेल, असा विचार करून आनंदी होणाऱ्या व्यक्तिसारखे राहुल गांधी वागत होते. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुजची नाकाबंदी केल्यानंतर तर राहुल गांधींना अल्ला आपल्यावर मेहबान आहे, असा साक्षात्कार झाला. मोदींचे परराष्ट्र धोरण कसे चुकीचे आहे. त्यांना यातले कसे काहीच कळत नाही, डॉ.जयशंकर यांचे परराष्ट्र धोरण किती पडेल आहे. आमचे धोरण कसे योग्य होते. सोनिया गांधी कशा ग्रेट, त्यांच्या हातचे बाहुले बनलेले डॉ.मनमोहन सिंह किती ग्रेट. अशा आशयाचे युक्तिवाद काँग्रेसचे नेते, प्रवक्ते आणि त्यांच्या प्रचार टोळीकडून करण्यात येत आहेत.
भारताने इराणशी संबंध बिघडवल्यामुळे हे सगळे झाले, असा तर्क रेटण्याचा प्रयत्न सुरू होता. इराण आता आपली ठासणार असा त्यांचा सुर होता. मोदी अडचणीत आल्याची त्यांची खात्री झाली होती. काँग्रेसच्या चवचाळ प्रवक्त्यांच्या पत्रकार परिषद असो वा नेत्यांचे युक्तिवाद सगळ्यात हाच चिखल भरलेला होता. काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्या बोलण्यात कायम विचारवंत असल्याचा आव असतो. प्रत्यक्षात यांचे युक्तिवाद म्हणजे वैचारिक दिवाळखोरीचा उत्तम नमुना असतो. त्यांनीही केंद्र सरकारच्या तथाकथित अपयशावर, कमजोर आणि दिशाहीन परराष्ट्र धोरणावर टीका करून घेतली.
इराण युद्धाच्या प्रकरणात मध्यस्ती करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी एक्सवर पोस्ट अपलोड करून दिला. ट्रम्प यांनी ती पोस्ट रिपोस्ट केली. त्यामुळे काँग्रेसला पाकिस्तान प्रेमाचे असे काही भरते आले, की बस रे बस. आपला माणूस चमकतोय हे पाहून राहुल गांधींची काँग्रेस पूर्ण भरात येऊन पाकिस्तानच्या आरत्या ओवाळू लागली. पाकिस्तान इराण युद्ध प्रकरणात मध्यस्त म्हणून महत्वाची भूमिका बजावत असल्यामुळे भारतासाठी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण झाली आहे, या शब्दात जयराम रमेश यांनी एक्सवर एक पोस्ट टाकून मोदींवर शरसंधान केले. आपण अगदीच पाकिस्तानची चाटतो आहे, हे लक्षात येऊ नये म्हणून त्याच पोस्टमध्ये समतोल साधत पाकिस्तान कसा दहशतवादी देश आहे असेही सांगून टाकले.
परराष्ट्र मंत्री डॉ.एस जयशंकर हे आंतरराष्ट्रीय राजकारणात अत्यंत मुरलेले व्यक्तिमत्व. परखड आणि धारधार वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारत असले दलालीचे धंदे करत नाही, असे सुनावले. हे वक्तव्य पाकिस्तानची दलाली करणाऱ्या काँग्रेसला प्रचंड झोंबले.
पलटवार खरे तर पाकिस्तानने केला होता. परंतु पाकिस्तानची दलाली करणाऱ्या काँग्रेसने पाकिस्तानच्या बाजूने युक्तिवाद सुरू केला. रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भात डॉ.जयशंकर यांनी केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत ही दलाली नव्हती काय, असा सवाल जयराम रमेश यांनी केला. केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसचे पाकिस्तान प्रेम इतके अस्सल आणि आंधळे आहे की त्यांना दगड आणि सोन्याची लगत यातला फरक कळत नाही. डॉ.जयशंकर आणि शाहबाज शरीफ यांच्या वक्तव्यात जमीन आस्मानचे अंतर आहे. डॉ.जयशंकर म्हणाले होते की, ‘रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या राजधानीत जाऊन दोन्ही देशांची बोलणी करण्याची ताकद असलेले जगात मोजके देश आहेत. आमच्याकडे शांतीचा कोणताही प्रस्ताव किंवा योजना नाही, परंतु जगात या युद्धामुळे जी अस्वस्थता निर्माण झाली आहे, ती दूर करण्यासाठी काही मदत होत असले तर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’
पाकिस्तानला मध्यस्तीची खुमखुमी होती. शाहबाज शरीफ यांनी स्वत: तशी ऑफर दिली होती. ते श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे करत होते. रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध संपवण्यासाठी भारत मदत करू शकतो, असे मत दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केले होते. भारताने पुढाकार घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भारताने फक्त त्यावर प्रतिक्रिया दिली होती. हा देशाचा सन्मान होता. परंतु काँग्रेस सध्या जागतिक स्तरावर देशाची फजिती आणि अपमान करण्याच्या मोहिमेवर आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या पालख्या खांद्यावर नाचवण्याची, पाकिस्तानला बाप बनवायची काँग्रेसची तयारी आहे. काँग्रेस आणि पाकिस्तान म्हणजे दो जिस्म एक जान. पाकिस्तानला दलाल म्हटल्यामुळे शाहबाज शरीफ यांच्यापेक्षा जास्त भडका पाकिस्तानची दलाली करणाऱ्या काँग्रेसला आला.
पाकिस्तानच्या मुत्सद्देगिरीवर फिदा झालेल्या जयराम रमेश यांचे हृदय इतके भरून आले की शाहबाज भेटले असते तर त्यांनी अक्षरश: त्यांच्या पायावर त्यांनी लोळण घातली असती.
जयराम रमेश यांची दलाली आणि काँग्रेसचा भंपकपणा इराणनेच उघडा पाडला. पाकिस्तानची मध्यस्ती नको, अशी स्पष्ट भूमिका इराणने घेतली. तीही पाकिस्तानमध्ये बसून. इराणचे पाकिस्तानातील राजदूत रजा अमिरी मोघादम यांनीच शरीफ यांच्या मध्यस्तीचा दावा फेटाळला. इराण आणि अमेरिकेत कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष वाटाघाटी सुरू नाहीत, असे ठणकावून सांगितले.
काँग्रेसला हा मोठा मानसिक धक्का होता. बापाचा असा अपमान झाल्यामुळे काँग्रेस पक्ष प्रचंड कळवळला. परंतु आता थोबाड फुटले, करणार काय अशी परिस्थिती आहे. इराणने फक्त मध्यस्ती नको म्हणून फटकारले नाही तर होर्मुजमधून येणारे पाकिस्तानी जहाजही रोखले. काँग्रेसच्या नेत्यांनी पाकिस्तानला जागतिक राजकारणाच्या रंगमंचावर केंद्रस्थानी ठेवण्याचा प्रयत्न केला. दोघांचीही फजिती झाली.
आम्ही किती ग्रेट होतो, सध्याचे सरकार किती बकवास आहे. त्यांच्याकडे उत्तम परराष्ट्र नीतीचा कसा अभाव आहे, हेच काँग्रेसवाल्यांच्या बडबडीचे सूत्र असते. हे स्वाभाविक आहे, राहुल गांधी यांच्यासारख्या कुवतीच्या नेतृत्वाला जे लोक खांद्यावर घेतात, त्यांची बुद्धीमत्ता आणि योग्यता काय आणि किती असेल हे जनताही ओळखून आहे.
डॉ. मनमोहन सिंह यांचा जयजयकार केला तर लोक त्यांच्या मुर्दाड परराष्ट्र नीतीची दहा उदाहरणे तोंडावर फेकतात, हे लक्षात आल्यामुळे काँग्रेस आता इतिहासात आणखी थोडे मागे जात आहेत. नेहरु आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील परराष्ट्र मंत्री कृष्ण मेनन यांचे दाखले देऊन पुन्हा एकदा आम्ही किती ग्रेट, आमचा इतिहास किती ग्रेट अशी टीमकी वाजवतायत.
हेही वाचा :
मंत्री नरहरी झिरवळांचा वादग्रस्त व्हिडिओ समोर
भारत आमचा मित्र, त्यांना सामुद्रधुनी खुली!
जिंकलो रे! ट्रम्पना का करावी लागली ही घोषणा
सोनं-चांदीत अस्थिरता कायम; गुंतवणूकदारांसाठी संधी की धोका?
काँग्रेसच्या दुर्दैवाने त्यांचे सगळेच धुरंधर पडेल आहेत. हे कृष्ण मेनन म्हणजे तेच ज्यांच्या नादी लागून नेहरुंनी चीनचे आक्रमण ओढवून घेतले. त्या आधी भारताचा व्यवस्थित पराभव होईल अशी जय्यत तयारी त्यांनी केली होती. भारताची हजारो किलोमीटर भूमी गमावली. युद्धात मार खाल्ल्यानंतर संरक्षण मंत्री पदावर असलेल्या नेहरुंनी स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी मेनन यांचा बळी घेतला. त्यांची हकालपट्टी केली.
या पराभवानंतर आचार्य कृपलानी, राम मनोहर लोहीया, अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत सरकारचे वाभाडे काढलेच. परंतु नेव्हील मॅक्सवेल या ब्रिटिश पत्रकाराने इंडीयाज चायना वॉर या पुस्तकात हा पराभव नेहरु आणि मेनन यांच्या धोरणाचाच पराभव असल्याचा निष्कर्ष काढला. मॅक्सवेल हे एकमेव नाही, असे बरेच आहेत. मॅक्सवेल हे ६० च्या दशकात लंडनमधून प्रसिद्ध होणाऱ्या द टाईम्सचे भारतातील प्रतिनिधी होते.
मल्लिकार्जुन खरगे काय किंवा जयराम रमेश काय ही अशी नेते मंडळी आहेत, ज्यांना राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे नेतृत्व हिमालयासारखे वाटते, शाहबाज शरीफ हे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीचे भीष्माचार्य वाटतात, त्यांना डॉ.मनमोहन सिंह आणि नेहरु यांच्या काळात झालेला देशाचा खेळखंडोबा म्हणजे सुवर्ण युग वाटणे स्वाभाविक आहे. समस्या त्यांच्या जनुकांमध्ये ठासून भरलेल्या गुलामीच्या मानसिकतेची आहे. या समस्येवर कोणताही उपचार नाही.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







