तृणमूलनेही अभिषेकवर फेकली अंडी

तृणमूलनेही अभिषेकवर फेकली अंडी

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमधील वरिष्ठ नेते कल्याण बॅनर्जी यांचे एक वक्तव्य समोर आले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक प्रकारे ममता बॅनर्जींना एक पर्याय दिला की, एक तर कल्याण बॅनर्जी राहतील किंवा अभिषेक बॅनर्जी राहतील. तुम्हाला त्या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल. कारण अभिषेक बॅनर्जी हे अहंकारी आहेत, ते एकतर्फी निर्णय घेतात मला न कळवताच त्यांनी निर्णय घेतला, असं त्यांनी सांगितलं.

हे प्रकरण कोणत होतं तर सध्या कोर्टामध्ये जे प्रकरण चालू आहे खोट्या स्वाक्षऱ्यांचं आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधातलं. या प्रकरणामध्ये तृणमूल काँग्रेसचे नेते म्हणून आणि वकील म्हणून कल्याण बॅनर्जी हे खटला चालवतायत. पण त्यांना कुठेतरी बाजूला करण्यात आलं आणि त्यांच्या ठिकाणी त्यांच्यापेक्षा कनिष्ठ वकिलांची नियुक्ती करण्यात आली. कल्याण बॅनर्जींची आता आम्हाला गरज नाही, अशा पद्धतीचा संदेश त्यांना पोहोचवण्यात आला आणि त्यामुळे कल्याण बॅनर्जी खवळलेले आहेत, संतापलेले आहेत. मी एवढा पक्षातला वरिष्ठ नेता आहे, ज्येष्ठ नेता आहे आणि त्याला अशा पद्धतीने वागणूक दिली जाते. एकप्रकारे केराच्या टोपलीत भिरकावून दिलं जातं. त्यामुळे एक तर अभिषेक बॅनर्जी राहतील पक्षामध्ये किंवा मी राहीन अशी भूमिका त्यांनी घेतली आहे आणि एक प्रकारे त्यांनी ममता बॅनर्जींना पर्याय दिलेला आहे.

या संदर्भातली प्रतिक्रिया आलेली नाही, पण कल्याण बॅनर्जींची ही जी काही प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया काही नवीन नाही. चार मे रोजी जेव्हा पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर हळूहळू पक्षाची जी काही दुर्दशा आपण पाहतोय त्यात तृणमूल काँग्रेसचे जवळपास ६० आमदार वेगळे झालेत, त्यांनी वेगळा गट तयार केला आहे. ऋतुव्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली हा गट त्यांनी तयार केलेला आहे आणि त्यांची सुद्धा अशीच पक्षाबद्दलची नाराजी आहे. पण ऋतुव्रत बॅनर्जी यांची ममतांबद्दल नाराजी नाही. त्यांची नाराजी अभिषेक बॅनर्जी यांच्या अहंकारी स्वभावाबद्दल आहे, त्यांच्या दादागिरी बद्दल आहे. पक्षामध्ये जी त्यांची एकतर्फी सगळी काम सुरू आहेत, त्याबद्दल त्यांची तक्रार आहे, आक्षेप आहे. त्यातून हा ६० आमदारांचा वेगळा गट तयार झाला. अशाच पद्धतीने खासदार सुद्धा वेगळे झालेत. जवळपास १९ खासदारांची यादी समोर आलेली आहे. ज्याच्यामध्ये शत्रुघ्न सिन्हा, युसूफ पठाण यासारखे सुद्धा खासदार आहेत. त्यांनी वेगळा गट तयार केलेला आहे पण त्यांचीही नाराजी ममता बॅनर्जी बद्दल नाही. ममता बॅनर्जी आमच्या नेत्या आहेत,  त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदराची भावना आहे असं ते म्हणतायत.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी प्रथमच करणार स्लोव्हाकियाचा दौरा

अदानी, रिलायन्स आणि वेदांताची दुर्मिळ खनिज क्षेत्रात दमदार एंट्री

आकाशात झेपावला ‘आत्मनिर्भर भारता’चा नवा योद्धा

पश्चिम आशियातील तणावामुळे शेअर बाजारात अस्थिरता

आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेला निवडणुकीचा प्रचार सुरू होता तेव्हा अभिषेक बॅनर्जी गर्जना करत होते की चार मे रोजी निकाल लागला की काय होतंय ते बघा. अमित शहांना आम्ही दाखवून देऊ वगैरे वगैरे पद्धतीची भाषा ते वापरत होते. प्रत्यक्षात ४ मे रोजी निकाल लागला आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसची पूर्णपणे धूळधाण उडाली, प्रचंड मोठा पराभव सहन करावा लागला. जो तृणमूलसाठी अनपेक्षित होता. त्यानंतर आपण पाहिलं की अभिषेक बॅनर्जी एका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांना भेटायला जात होते, त्यावेळेला त्यांना हेल्मेट घालून जावं लागलं. गाडीतून उतरल्यानंतर ते स्कूटरने जात असताना ते हेल्मेट घालून जात होते. कारण लोकांनी त्यांच्यावर अंडी फेकली, काही लोकांनी चपला मारल्या, काही लोकांनी गुद्दे मारले तर काही लोकांनी कपडे फाडले. अभिषेक यांची अगदी वाईट अवस्था तेव्हा झाली. त्यावेळेला अभिषेक बॅनर्जी हे त्या अवस्थेतच शेवटी त्या कुटुंबाकडे गेले, त्यांच्याशी बोलले आणि तेव्हा पत्रकारांना ते म्हणाले की बघा कशा पद्धतीने बंगालमध्ये सरकार बदलल्यानंतर कशी दडपशाही सुरू आहे, राजकारण खेळलं जातय. एका विरोधी पक्षातल्या नेत्यावर कशा पद्धतीने हल्ला केला जातोय, किती असहिष्णुता वाढली आहे.  अभिषेक यांनी राजकारण करण्याचा बराच प्रयत्न केला. पण अभिषेक यांच्याविरुद्ध लोकांच्या मनात राग होता, तोच त्या अंडी फेकण्यातून बाहेर येत होता. तृणमूल काँग्रेसच्या दडपशाहीबद्दलचा तो रोष होता. अभिषेक बॅनर्जी यांनी जी दडपशाही चालवली होती, जो कट मनी घेतला जात होता, लोकांवर हल्ले केले जात होते, महिलांवर अत्याचार होत होते, भाजपच्या कार्यकर्त्यांची घरे जाळली जात होती. या सगळ्या अन्यायामुळे लोकांच्या मनात हा राग खदखदत होता आणि नेमके अभिषेक बॅनर्जी त्यांना सापडले आणि त्यातून लोकांनी अंडी मारून, चपला मारून त्याचा निषेध नोंदवला.

एकंदरीतच पक्षाची सगळी सूत्रही अभिषेक बॅनर्जीकडे आली होती आणि त्यातून पक्षातले वरिष्ठ लोक हे नाराज झाले होते त्यांना कुठेतरी बाजूला करण्यात आल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली होती. पण ते कुठेही बोलून दाखवत नव्हते कारण शेवटी निवडणुकीत काय होईल माहित नव्हते. उद्या कदाचित ममता बॅनर्जींचे सरकार पुन्हा आलं तर हा विरोध आपल्याच अंगलट येईल, अशी या वरिष्ठ आमदार, खासदारांची भावना होती. त्यामुळे तेव्हा सगळेच गप्प होते. पण आज जेव्हा ममता बॅनर्जी यांच्या सरकारचा पाडाव झाला, संपूर्ण पक्षाची धूळधाण झाली त्यानंतर या सगळ्यांना आता बोलण्याची संधी मिळालेली आहे आणि म्हणून ते अभिषेक बॅनर्जी यांना लक्ष करतायत.

अभिषेक बॅनर्जीबद्दल राग जनतेच्याच मनात नव्हता तर तृणमूलच्या नेत्यांमध्ये सुद्धा राग होता. पण तो दिसत नव्हता त्यामुळे अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या कार्यकाळामध्ये उच्छाद मांडला. जहांगीर खान, शहाजहा शेख सारखे लोक अत्याचार करतायत, पण तृणमूल काँग्रेस त्याबद्दल ढिम्म होती एक शब्दही बोलायला तयार नव्हती. कार मेडिकल हॉस्पिटल मध्ये जो बलात्कार झाला त्याबद्दल ममता बॅनर्जींची भूमिका निश्चितपणे संदिग्ध होती. याचं कारण होतं अभिषेक बॅनर्जी यांच्याकडे असलेली पक्षाची सूत्रं. जहांगीर खान काय म्हणत होता तेव्हा? पोलीस स्वतःला सिंघम समजत असतील तर मी पुष्पा आहे.  त्याची दादागिरीची भाषा होती. पण प्रत्यक्ष निवडणूक झाल्यानंतर जे निकाल लागले त्यानंतर मात्र हा जहांगीर खान पळून गेला नेपाळमध्ये. पळतानाच त्याला पकडण्यात आलं. तिथून तो कदाचित परदेशात पळण्याच्या तयारीत होता. कदाचित त्याला पाकिस्तानात किवा बांगलादेशला जायचं असावं. फाल्टामधून तो निवडणूक लढवणार होता पण त्याने माघार घेतली आयत्या वेळेला. भीतीमुळे त्याने आधीच माघार घेतली.  अशी लोक अभिषेक बॅनर्जी यांनी पाळली होती. त्यांची गुंडगिरी, दादागिरी यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर त्रस्त होते आणि केवळ सर्वसामान्य जनता नव्हे तर तृणमूल मधले सुद्धा जे कार्यकर्ते प्रमुख नेते वरिष्ठ नेते हे सुद्धा त्रस्त होते. फक्त ते बोलू शकत नव्हते, ते आज बोलतायत.

आपल्याला माहिती असेल की जेव्हा एखाद्या सभेमध्ये एखादा वक्ता बोलत असतो तेव्हा प्रेक्षकांमधून एखादा माणूस उठतो आणि त्याच्या दिशेने चप्पल भिरकावतो किंवा एखादा कागदाचा बोळा फेकून मारतो. एखादा अंडे फेकून मारतो. त्याच्या मागचं कारण काय असतं तर निषेध नोंदवणं. त्याला त्या व्यक्तीबद्दल राग असतो, त्या व्यक्तीच्या विचारा बद्दल राग असतो त्याच्या प्रवृत्ती बद्दल राग असतो किंवा त्याच्या ढोंगीपणाबद्दल त्याला राग असतो आणि म्हणून तो त्याच्या दिशेने अंडी फेकतो चपला मारतो आणि आपला राग नोंदवतो. अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी लोकांनी फेकली त्या मागे तोच राग होता.

आता तृणमूलचे ६० आमदार वेगळे झाले, खासदार वेगळे झाले आणि सगळ्यांचं एक मत आहे की ममता बॅनर्जी आमच्या नेत्या आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या मनात कोणत्याही पद्धतीचा अनादर नाही. आम्ही त्यांचा आदरच करतो पण अभिषेक बॅनर्जी आम्हाला नको. कल्याण बॅनर्जी सुद्धा मानू लागलेत की अभिषेक नको. याचा अर्थ स्पष्ट आहे की, सगळे आमदार, खासदार हे आता अभिषेक बॅनर्जीवर अंडी फेकू लागलेले. आहेत एका अर्थाने प्रतीकात्मक दृष्ट्या हा निषेध नोंदवला जातोय. सध्या तरी प्रतिकात्मक पद्धतीने ते अभिषेक बॅनर्जी यांच्यावर अंडी फेकतायत, एक प्रकारे त्यांचे कपडे फाडतायत असं म्हणू शकतो. आता ममता बॅनर्जींना निर्णय घ्यायचा आहे की त्यांना अभिषेक बॅनर्जी हवेत की हे सगळे आमदार, खासदार हवेत आणि त्यांनी जर तसं ठरवलं असेल की ठीक आहे आम्हाला आमदार, खासदार नकोत, मला अभिषेक बॅनर्जीच हवेत. तर मग ते अभिषेक बॅनर्जींना घेऊन त्या काँग्रेसमध्ये जाऊ शकतात पण त्याच्यामुळे त्यांच नुकसानच होणार आहे आणि अशा या अभिषेक बॅनर्जी सारख्या प्रवृत्तीला काँग्रेस कितपत सहन करेल हे सुद्धा बघणं महत्त्वाचंच आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी समोर आता हे सगळं एक आव्हान आहे की, अभिषेक बॅनर्जींना सोबत ठेवायचं की नाही. उद्या कदाचित ममता बॅनर्जींना वाटायला लागलं की अभिषेकमुळे पक्षाचं नुकसान होतय तर ममता बॅनर्जी सुद्धा अभिषेक बॅनर्जीवर प्रतिकात्मक अंडी फेकायला कमी करणार नाहीत.

Exit mobile version