कट शिजण्याआधीच दहशतवादी जाळ्यात येतायत? नेमकी गोम काय ?

दहशतवादी हल्ल्याचा कट उद्ध्वस्त करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश

कट शिजण्याआधीच दहशतवादी जाळ्यात येतायत? नेमकी गोम काय ?

गेल्या दहा वर्षात देशात एकही घातपाताची घटना घडली नाही. उदंड प्रयत्न करूनही देशातील गद्दार आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना हे शक्य झाले नाही. कारण घतापात घडण्याआधी दहशतवादी सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात येतात. पुन्हा यावर शिक्कामोर्तब झाले आहे. गुजरात एटीएसने तीन खतरनाक दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. देशातील संघ कार्यालये आणि धार्मिक स्थळांवर घाऊक हल्ले करण्याचा त्याचां कट होता. इस्लामिक स्टेट्स खोरासानशी यांचा थेट संबंध आहे. या घाऊक अटका कशा होतात, दहशतवाद्यांचे कट शिजण्या आधी कसे उधळले जातात. कारण एकच आहे, भारत इस्त्रायलच्या पावलावर पाऊल टाकून चाललेला आहे.

अटक केलेल्या दहशतवाद्यांकडे खतरनाक विष सापडलेले आहे. संघ शाखांना टार्गेट करण्याचा त्यांचा इरादा होता. देशात मोठा रक्तपात करण्याच्या ते प्रयत्नात होते. देशाच्या विरोधात कट शिजवणारे दहशतवादी, देशद्रोही नियमितपणे सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात येत आहेत. एकही कट यशस्वी होत नसल्यामुळे दहशतवादी हादरलेले आहेत. कारण घातपात करणाऱ्यांचे चेहरे ओळखणारी दिव्यदृष्टी डीआरडीओ कृपेने आपल्या सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे त्यांना घातपात करण्यापूर्वीच रोखणे शक्य होत आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लष्करशहा आणि दहशतवादी खवळले आहेत. वचपा काढण्यासाठी धडपडतायत. त्यांची समस्या एवढीच आहे की, भारतीय सेनादल सज्ज आहे आणि दुसऱ्या बाजूला देशांगर्त सुरक्षेसाठी आपली सुरक्षा दले अहोरात्र मेहनत घेत आहेत. सुरक्षा दलांच्या सजगतेचा फायदा आपल्याला होतोय कारण कटवाले घातपात घडवण्याआधीच पकडले जाते आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पाकिस्तानी दहशतवादाचे जाळे मोडून काढण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावलेली आहे. दहशतवाद्यांना अटक होण्याची संख्या मोठी आहे. कारण सुरक्षा दलांकडून सढळ हस्ते होणारा एआय तंत्रज्ञानाचा वापर.

भारतात काही मोठ घडवण्यासाठी दहशतवादी धडपडतायत. मनसुबा उघड आहे. पाकिस्तानातील खैरपूर तामेवाली येथे कट्टरवाद्यांच्या एका रॅलीत लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला सैफ म्हणाला की, हाफीज सईद स्वस्थ बसलेला नाही. तो बांगलादेशातून भारतावर हल्ला करण्याची योजना बनवतोय. पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांचा मंत्री तलाल चौधरी याने पाकिस्तानी मरकजी मुस्लीम लीग या संघटनेच्या फैसलाबाद कार्यालयाला भेट दिली. हा हाफीज सईदच्या दहशतवादी संघटनेना राजकीय पक्ष आहे.

या पार्श्वभूमीवर एक गोष्ट उघड आहे की, ना हाफीज स्वस्थ बसलाय, ना त्याची पाठ राखण करणारे पाकिस्तानी नेते. भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर तो पाकिस्तानचा हल्ला मानला जाईल असा ईशारा दिल्यामुळे आतापर्यंत सगळे शांत चालले आहे. परंतु त्यांचे प्रय़त्न सुरू आहेत.

गुजरात एटीएसने आझाद सुलेमान शेख, मोहम्मद सुहैल आणि अहमद मोईउद्दीन सईद या तीन खतरनाक दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. या मोईनुद्दीनकडे चीनची एमबीबीएस डीग्री आहे.  म्हणजे तो चीनी डॉक्टर आहे. एरंडेलच्या बिया आणि सायनाईडचा वापर करून एक खतरनाक विष बनवण्याचा प्रयत्न करत होता. घाऊक हत्यांसाठी याचा वापर करण्यात येणार होता. शेख आणि सुहैल यांनी राजस्थान सीमेवरील हनुमान गढ येथून हत्यारे मिळवली होती. गांधीनगर येथील एका कब्रस्थानात ही हत्यारे लपवण्यात आली होती. ती येथून हैदराबादेत नेण्यात येणार होती.

हे ही वाचा:

राजस्थान, गुजरात आणि अरबी समुद्रात संयुक्त मोहीम

इटलीची डाळ इथे शिजणार नाही

चाकणकरांशी वाद; प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरेंना डच्चू, मिटकरींचीही हकालपट्टी

कर्नाटकातील तुरुंगात कैद्यांचे नाचगाणे; तुरुंग अधिकाऱ्याची बदली

गुजरात एटीएसला मोईनद्दीनबाबत माहिती मिळाली. त्याला अटक करण्यात आली. त्याच्या फोनमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे शेख आणि सुहैल यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे ४ विदेशी बनावटीची पिस्तूले, ३० काडतूसे आणि ४ लिटर एरंडाचे तेल सापडले आहे. एरंडाच्या बियांपासून रिसिन नावाचा अत्यंत विषारी घटक मिळतो यापासून सायनाईडपेक्षा जास्त जालीम विष तयार कऱण्याच्या प्रयत्नात मोईनुद्दीन होता. मोईनुद्दीन हा इस्लामिक स्टेट्स खोरासान या दहशतवादी संघटनेचा सदस्य अबु कदीम याच्या संपर्कात होता. कदीमने मोईनुद्दीनवर गुजरातसह देशभरता दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवण्याची जबाबदारी सोपवली होती.

अहमदाबाद, दिल्ली आणि लखनौ येथील संघ कार्यालयांवर हल्ला करण्याची त्यांची योजना होती. संघ मुख्यालयात सुरक्षा व्यवस्था कशी आहे, इथे कितपत गर्दी होते. सुरक्षेसाठी किती बंदोबस्त आहे, डिजिटल सुरक्षेची स्थिती कशी आहे, अशी तपशीलवार माहिती त्यांनी जमा केली होती. काही महत्वाची धार्मिक स्थळेही त्यांचा रडारवर होती. बहुधा अन्नात किंवा पाण्यात मोठ्या प्रमाणात विषप्रयोग करून मोठ्या संख्येने हत्या घडवण्याचा कट हे तिघे शिजवत होते.

एका बाजूला हाफीज सईद काँग्रेस पक्षाची प्रशंसा करतो. काँग्रेस पक्षाचे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियांक खरगे संघावर बंदी आणण्याची भाषा करतात. आणि कट्टरतावादी दहशतवादी देशातील संघ कार्यालयांवर हल्ले करण्याची योजना बनवतात यात नक्कीच काही सूत्र आहे.

देशात काही अभद्र घडवण्याचा प्रयत्न बराच काळ सुरू आहे. देशात सतत दहशतवाद्यांना धरपकड होते आहे. अल कायदा, इस्लामिक स्टेट्स, पीएफआयचे दहशतवादी आणि सोबत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या अनेकांची सतत धरपकड होते आहे. कट शिजण्यापूर्वी कटाची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळते आहे. याचे कारण डीआरडीओने विकसित केलेली दिव्य दृष्टी प्रणाली. डीआरडीओने फेस रिकग्निशन सिस्टीम तयार केलेली आहे. जी मास्क, गॉगल्स, विग्स, दाढी, टोपी यांचा वापर करून दडवलेल्या छुप्या चेहऱ्यांची ओळख करू शकते. या प्रणालीमध्ये अत्याधुनिक एआय अल्गोरिदमचा वापर करण्यात आलेला आहे. हलक्या दर्जाच्या कॅमेराने टिपलेल्या चेहऱ्यांची ओळख या प्रणालीमुळे सहज पटू शकते.

दिवस असो वा रात्र, इंटरनेट उपलब्ध असो वा नसो ही प्रणाली काम करू शकते. प्रकाश अपुरा असो, गर्दी असो, चेहरे झाकलेले असो, ही प्रणाली चोख काम करते. गुन्हेगार आणि दहशतवादी कोणीही असो या दिव्यदृष्टीपासून कोणीही वाचू शकत नाही. फिंगरप्रिंट, पाम प्रिंट आणि आय स्कॅनपेक्षाही ही उपयुक्त असलेली ही यंत्रणा सीमेवर लष्कराकडूनही वापरली जाते. देशांतर्गत सुरक्षेसाठीही याचा उपयोग होतो आहे.

इस्त्रायलच्या एनएसओ समुहाची निर्मिती असलेल्या पॅगेसेस प्रणालीवर राहुल गांधी आणि अन्य राजकीय पक्षांनी ओरडा केला होता.  फोन कॉल, मेसेज, कॅमेरा, मायक्रोफोनचा ताबा घेण्याची क्षमता या प्रणालीमध्ये आहे. ज्याचा वापर सुरक्षा यंत्रणा दहशतवादी आणि गुन्हेगांरांच्या विरोधात करीत आहेत. इस्त्रायलने याचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला आहे. गाझाच्या चेक पॉईंटवर पॅलेस्टीनी नागरीकांच्या फेस रिडिंगसाठी कॅमेरे लावण्यात आले आहेत. या बायोमेट्रीक डेटाचा वापर इस्त्रायली सुरक्षा यंत्रणांकडून होत असल्यामुळे एम्नेस्टीसारख्या संघटनांनी या विरोधात मोठी ओरड केली. अहवाल बनवले. आरोप केले. त्या संदर्भात इस्त्रायली सरकारकडून या संदर्भात त्यांचे म्हणणे काय हे मागितले. अर्थात इस्त्रायल सरकारने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. दहशतवाद्यांना हुडकणे आणि ठोकणे या कामात इस्त्रायलची प्रचंड अचूकता दिसते. त्याच्या मागे हे तंत्रज्ञान आहे. भारतही आता इस्त्रायलच्या पावलावर पाऊल टाकतो आहे. तुर्तास हुडकण्यापर्यंत भारताची प्रगती झालेली आहे. सध्या तरी देशात ठोकाठोकी होत नाही. अर्थात पावले त्याच दिशेने पडताना दिसत आहेत.

एका बाजूला असलेले खबऱ्यांचे जाळे, म्हणजे ह्युमन इंटेलिजन्स, डीजिटल इंटेलिजन्स आणि त्याच्या जोडीला डीआरडीओने विकसित केलेली दिव्यदृष्टी, अशी भक्कम यंत्रणा भारताने निर्माण केलेली आहे. दहशतवाद्यांची खोड मोडण्याचे त्यामुळे तडफेने होते आहे.

(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Exit mobile version