अमेरिकेनंतर आता चीनने भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्यासाठी मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. भारताने दुसऱ्या कोणाच्या हस्तक्षेपाला वारंवार नकार देऊन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीच्या दाव्यांना ठाम विरोध करूनही, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी सांगितले की, मे महिन्यात भारत- पाकिस्तान तणावात चीनने मध्यस्थी केली होती.
बीजिंगमध्ये आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि चीनच्या परराष्ट्र संबंधांवरील परिसंवादात बोलताना वांग म्हणाले की, जगात संघर्ष आणि अस्थिरतेत तीव्र वाढ झाली आहे. या वर्षी, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर कधीही न झालेल्यापेक्षा जास्त वेळा स्थानिक युद्धे आणि सीमापार संघर्ष भडकले. भू-राजकीय अशांतता पसरत राहिली, असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय संघर्षांना तोंड देण्यासाठी चीनने वस्तुनिष्ठ आणि न्याय्य भूमिका स्वीकारली आहे असे वांग म्हणाले. समस्या सोडवण्याच्या या चीनच्या दृष्टिकोनाचे अनुसरण करून, आम्ही उत्तर म्यानमार, इराणी अणुप्रश्न, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील तणाव, पॅलेस्टाईन आणि इस्रायलमधील मुद्दे आणि कंबोडिया, थायलंडमधील अलिकडच्या संघर्षात मध्यस्थी केली, असे म्हणत वांग यांनी चीनच्या मध्यस्थीचा दावा केला.
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात झालेल्या लष्करी संघर्षानंतर वांग यांचे हे विधान आले आहे. भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य करून ऑपरेशन सिंदूर सुरू केले आणि नंतर त्यात लष्करी प्रतिष्ठानांचा लक्ष्य करण्यात आला. चार दिवस चाललेला संघर्ष कोणत्याही बाह्य शक्तीच्या सहभागाशिवाय थेट लष्करी ते लष्करी संवादाद्वारे सोडवण्यात आला, असे भारताने सातत्याने सांगितले आहे. १३ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत, परराष्ट्र मंत्रालयाने बाहेरील मध्यस्थीचे दावे फेटाळून लावले.
हे ही वाचा:
एका दिवसातच चांदीत १२,००० रुपयांची वाढ
हार्दिक पांड्याला न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती मिळण्याची शक्यता
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा भारत- पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. भारताने हा दावा वारंवार फेटाळून लावला आहे. तर, पाकिस्तानने मात्र ट्रम्प यांचे आभार मानले आहेत.







