पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात पुन्हा एकदा हिंसाचारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. बलुच बंडखोर गटांनी पाकिस्तानी लष्कर आणि सुरक्षा दलांवर एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ले केल्यामुळे संपूर्ण प्रांतात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराचे मोठे नुकसान झाल्याचा दावा बंडखोर गटांकडून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बलुच लिबरेशन आर्मी या संघटनेने नियोजित मोहिमेअंतर्गत बलुचिस्तानमधील अनेक शहरांमध्ये हल्ले केले. या कारवायांमध्ये लष्करी तळ, तपासणी नाके, पोलीस ठाणे, रेल्वे मार्ग तसेच सरकारी इमारती यांना लक्ष्य करण्यात आले. क्वेटा, ग्वादर, मस्तुंग आणि नोश्की या भागांमध्ये सर्वाधिक चकमकी झाल्याचे सांगण्यात येते. काही ठिकाणी महामार्गांवर तात्पुरता ताबा घेतल्यामुळे लष्कराची वाहतूक आणि पुरवठा व्यवस्था काही काळ विस्कळीत झाली.
हे ही वाचा:
राहुल गांधींनी घालविली पदाची प्रतिष्ठा!
पुस्तकातील उतारे वाचून दाखविण्याचा राहुल गांधींचा हट्ट, लोकसभेत गोंधळ
पाकिस्तानातून आलेल्या दलित हिंदूंना निवारा द्या!
ऑपरेशन सिंदूरमध्ये निर्णायक भूमिका बजावलेल्या विमानतळाचे नामकरण
बंडखोर संघटनेच्या दाव्यानुसार, या हल्ल्यांमध्ये १०० पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच मस्तुंग येथील एका कारागृहावर हल्ला करून सुमारे ३० कैद्यांना मुक्त केल्याचाही दावा करण्यात आला आहे. काही ठिकाणी आत्मघाती हल्लेखोरांचा वापर करण्यात आला असून स्फोटकांच्या माध्यमातून मोठी जीवितहानी झाल्याचे सांगण्यात येते.
दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने अतिरेक्यांचे हे दावे फेटाळले आहेत. लष्कराच्या म्हणण्यानुसार, प्रतिहल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोर ठार करण्यात आले असून सुमारे १४५ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अधिकृत माहितीनुसार, या संघर्षात १७ सुरक्षाकर्मी आणि ३१ सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या संपूर्ण बलुचिस्तानमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू आहे.
या वाढत्या हिंसाचारामुळे पाकिस्तानसमोरील अंतर्गत सुरक्षेचे आव्हान अधिक गंभीर बनले आहे. बलुचिस्तान हा प्रांत आधीपासूनच अस्थिर असून विकास, रोजगार आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांमुळे येथे दीर्घकाळापासून असंतोष आहे. तज्ज्ञांच्या मते, या परिस्थितीचा परिणाम चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांवरही होऊ शकतो. हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयश आल्यास बलुचिस्तानमधील परिस्थिती पाकिस्तान सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.







