भारताचे उपराष्ट्राध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी सोमवारी व्हिक्टोरियातील स्टेट हाऊस येथे सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांची भेट घेतली. या बैठकीदरम्यान दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याचे विविध मार्ग यावर सविस्तर चर्चा झाली. उपराष्ट्राध्यक्ष राधाकृष्णन हे सेशेल्सचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथग्रहण समारंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. या प्रसंगी त्यांनी भारत सरकार आणि जनतेतर्फे राष्ट्राध्यक्ष हर्मिनी यांचे पदभार स्वीकारल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.
उपराष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही नेत्यांनी हिंद महासागर क्षेत्रात आणि ग्लोबल साऊथमधील शांतता, स्थैर्य आणि समृद्धीबाबत आपल्या समान दृष्टीकोनाची पुन्हा पुष्टी केली. यापूर्वी राधाकृष्णन यांनी सेशेल्सचे नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष सेबॅस्टियन पिल्लै यांची स्टेट हाऊसमध्ये भेट घेतली आणि दोन्ही देशांतील द्विपक्षीय सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले की, “दोन्ही नेत्यांनी सामायिक वारसा, संस्कृती आणि लोकांमधील परस्पर संबंधांवर आधारित भारत–सेशेल्समधील बहुआयामी नातेसंबंधांवर चर्चा केली.”
हेही वाचा..
इंदूरहून धार्मिक पर्यटनासाठी धावणार ‘भारत गौरव’ रेल्वे
‘अस्लम’ कृपेने मुंबईत वसवला जातोय ढाका…
भारताचा ‘दुश्मन’ जाकिर नाईकला स्वीकारायला बांगलादेश सज्ज
भारताला मोठा धक्का! महिला विश्वकप उपांत्य फेरीतून प्रतिका रावल बाहेर
राधाकृष्णन रविवारी व्हिक्टोरियातील युनिटी स्टेडियममध्ये आयोजित शपथग्रहण समारंभात सहभागी होण्यासाठी सेशेल्सला रवाना झाले होते. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “सेशेल्स गणराज्याचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पॅट्रिक हर्मिनी यांच्या शपथग्रहण सोहळ्यात सहभागी होऊन मला अत्यंत आनंद झाला. भारत सरकार आणि जनतेतर्फे मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो.” उपराष्ट्राध्यक्षांनी सेशेल्समधील भारतीय समुदायाला संबोधित करताना, दोन्ही देशांमधील “दीर्घकालीन आणि बहुआयामी संबंधांवर” भर दिला. त्यांनी या संबंधांना अधिक मजबूत बनविण्यात प्रवासी भारतीयांच्या भूमिकेचे विशेष कौतुक केले.
सेशेल्समधील भारतीय समुदायाला उद्देशून राधाकृष्णन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘सागर’ (Security and Growth for All in the Region) ही संकल्पना हिंद महासागर प्रदेशातील स्वतंत्र, खुले आणि सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या भारताच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यांनी पुढे नमूद केले की, सेशेल्स हा या दृष्टीकोनाची अंमलबजावणी करण्यासोबतच ‘ग्लोबल साऊथ’च्या प्राथमिकता पुढे नेण्यात भारताचा एक महत्त्वाचा भागीदार राहिला आहे.
