राजधानी दिल्ली मधील शाहदरा परिसरात रविवारी पहाटे घडलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. विवेक विहार भागातील एका चार मजली निवासी इमारतीत अचानक आग लागून मोठी जीवितहानी झाली. या दुर्घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही आग पहाटे साधारण ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान लागल्याची माहिती मिळते. त्या वेळी बहुतांश रहिवासी गाढ झोपेत असल्याने त्यांना परिस्थितीची कल्पना येण्यास उशीर झाला. प्राथमिक अंदाजानुसार एसीमधील स्फोट किंवा शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी. काही मिनिटांतच आगीने भीषण रूप धारण केले आणि इमारतीत दाट धूर पसरला, ज्यामुळे लोकांना बाहेर पडणे कठीण झाले.
हे ही वाचा:
अमेरिकेचा F-16 रडार सपोर्ट करार भारतासाठी चिंता वाढवणारा? कसा ते घ्या जाणून
मेरठ-प्रयागराज: विकासाची ‘गंगा’
इराणचा युद्धबंदी प्रस्ताव; ट्रम्प यांची सावध भूमिका, तणाव कायम
पश्चिम बंगाल पुनर्मतदानाच्या वेळीही तणाव
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. पोलिस, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र काही जणांना वाचवता आले नाही, आणि त्यातच ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत इमारतीच्या दुसऱ्या मजल्याला सर्वाधिक फटका बसल्याचे समोर आले आहे. आगीचा आणि धुराचा प्रचंड मारा झाल्याने त्या मजल्यावरील रहिवाशांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही. काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी गॅलरी, खिडक्या आणि छताचा आधार घेतला. अग्निशमन दलाने काहींना थेट बाल्कनीतून बाहेर काढले, तर काहींना शिड्यांच्या सहाय्याने खाली आणण्यात आले.
घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळते. प्रशासनाकडून या घटनेवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातील इमारतींच्या अग्निसुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. अग्निसुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जाते, यावर आता चर्चा सुरू झाली आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कठोर उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
