पाकिस्तानने अखेर माघार घेतली असून शनिवार, १० मे रोजी भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. याविषयी पुढील बैठक ही १२ मे रोजी होणार आहे. या घोषणेनंतर, भारतीय सैन्याने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण कारवाईची माहिती दिली. युद्धबंदीच्या घोषणेनंतर भारतीय सैन्याने म्हटले की, पाकिस्तानचे इतके नुकसान केले आहे की त्यांच्या हल्ल्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या जमीन आणि हवाई तळांवर हल्ले झाले. भारतीय सैन्याने स्कार्दू, जेकबाबाद, सरगोदा आणि भुलारीसह पाकिस्तानी हवाई तळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. पाकिस्तानची हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार यंत्रणा नष्ट झाली, अशी माहिती देण्यात आली.
भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियंत्रण रेषेजवळील पाकिस्तानचे कमांड कंट्रोल, लॉजिस्टिक्स, लष्करी पायाभूत सुविधा आणि त्यांच्या सैनिकांचे इतके नुकसान झाले की त्यांची संरक्षण आणि गोळीबार करण्याची शक्ती नष्ट झाली. यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या खोट्या अजेंड्याचा बुरखा पुन्हा एकदा फाडला.
लष्कराच्या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “पाकिस्तानने दावा केला होता की, त्यांनी त्यांच्या JF 17 ने भारताच्या S400 आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवले, जे पूर्णपणे खोटे आहे. दुसरे म्हणजे, त्यांनी सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नालिया आणि भूज येथील आमच्या हवाई तळांना नुकसान पोहोचल्याची चुकीची माहिती देणारी मोहीम देखील चालवली होती, हा दावाही पूर्णपणे खोटा आहे. पाकिस्तानने पसरवलेल्या माहितीनुसार, चंदीगड आणि व्यास येथील आमच्या दारूगोळा डेपोंना नुकसान पोहोचले, हे देखील पूर्णपणे खोटे आहे, असे सैन्याने स्पष्ट केले.
हे ही वाचा..
पाकिस्तान आला शरण! भारताच्या प्रत्युत्तरानंतर म्हणे जमीन, हवा, समुद्रात लष्करी कारवाई नको
…तर भारत पाकिस्तानच्या दहशतवादी हल्ल्यांना युद्ध मानणार! भारताचा अंतिम इशारा
बातम्या देताना हवाई हल्ला सायरनच्या आवाजाचा वापर करू नका!
पुढे त्या म्हणाल्या की, पाकिस्तानने भारतीय सैन्याने मशिदींचे नुकसान केल्याचा खोटा आरोप केला. भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आमचे सैन्य भारताच्या संवैधानिक मूल्याचे एक अतिशय सुंदर प्रतिबिंब आहे. त्यामुळे हे दावेही खोटे असल्याचे सैन्याने स्पष्ट केले. तसेच विंग कमांडर व्योमिका सिंग म्हणाल्या, “आमच्या ऑपरेशन्समध्ये विशेषतः भारतविरोधी कारवायांसाठी वापरल्या जाणाऱ्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. भारतीय सशस्त्र दलांनी कोणत्याही धार्मिक स्थळाला लक्ष्य केले नाही.”