पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे शुक्रवारी दुपारी एका मस्जिदीत आत्मघातकी स्फोट झाला. हा स्फोट शुक्रवारीच्या नमाजच्या वेळी झाल्याने मोठ्या संख्येने भाविक मस्जिदीत उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत २० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून १६० पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, स्फोट इतका भीषण होता की संपूर्ण परिसर हादरला. काही क्षणांतच मस्जिदीत आणि आजूबाजूला धूर पसरला, काचा फुटल्या आणि भग्नावशेष सर्वत्र दिसू लागले. स्फोटानंतर एकच गोंधळ उडाला. अनेक भाविक जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले, तर काही जण स्फोटाच्या धक्क्याने खाली कोसळले. जखमी लोक रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी आक्रोश करत होते.
हे ही वाचा:
दोघांचे भांडण, तिसऱ्याचा फुटला डोळा! पोलिसांनी केली अटक
जीवलग मित्र गमावला, वाढदिवस साजरा करणार नाही!
सुरुवातीच्या घसरणीनंतर सावरला शेअर बाजार
टीव्हीकेचे पक्षप्रमुख, अभिनेते विजय यांच्यावरील दीड कोटींचा दंड कायम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आत्मघातकी स्फोट असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. संशयित हल्लेखोर मस्जिदीत प्रवेश करत असताना त्याने स्वतःवर बांधलेला स्फोटकांचा पट्टा उडविल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हल्ल्याची पद्धत आणि स्फोटकांचा प्रकार याबाबत अधिकृत तपास सुरू असून अंतिम माहिती नंतर जाहीर केली जाणार आहे.
घटनेनंतर तातडीने पोलीस, बचाव पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अनेक रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली असून डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी युद्धपातळीवर उपचार करत आहेत. रुग्णालयांच्या बाहेर नातेवाइकांची मोठी गर्दी जमली असून वातावरण अत्यंत तणावपूर्ण आहे.
या स्फोटानंतर संपूर्ण इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली असून धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पाकिस्तान सरकारकडून या आत्मघातकी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. वरिष्ठ नेत्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले आहे. सध्या कोणत्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
ही घटना देशातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आणणारी आहे. तपास यंत्रणा हल्ल्याच्या मागील कारणांचा शोध घेत असून पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.







