आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यातील वेटलापालेम परिसरात असलेल्या फटाका उत्पादन कारखान्यात भीषण स्फोट होऊन किमान २० जणांचा मृत्यू झाला असून ३० हून अधिक जण जखमी झाले आहेत. ही घटना दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोट इतका जबरदस्त होता की त्याचा आवाज ४ ते ५ किलोमीटरपर्यंत ऐकू गेला आणि आसपासच्या गावांमध्ये घबराट पसरली.
घटनेच्या वेळी कारखान्यात अंदाजे ५० ते ६० कामगार काम करत होते. अचानक झालेल्या स्फोटानंतर काही क्षणांतच भीषण आग लागली. ज्वलनशील रसायने आणि फटाक्यांचा साठा असल्यामुळे आग झपाट्याने पसरली. अनेक कामगारांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. काही जणांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमींना तातडीने काकीनाडा आणि राजामहेंद्रवरम येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा:
इस्रायल–ईराण तणावामुळे शेअर बाजार हादरणार?
जम्मू-काश्मीरचे खेळाडू कौतुकास पूर्णपणे पात्र
सोन्यात स्थिरता, चांदी २,८४,९०० रुपयांवर
स्फोटानंतर अग्निशमन दलाच्या ८ ते १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ बचावकार्य सुरू केले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. स्फोटामुळे कारखान्याची इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून शेजारील ५ ते ६ घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत.
प्राथमिक तपासानुसार, स्फोटाचे कारण रसायनांचा अति साठा किंवा सुरक्षेतील हलगर्जीपणा असू शकतो. मात्र नेमके कारण शोधण्यासाठी अधिकृत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कारखान्याकडे आवश्यक परवाने आणि सुरक्षा उपाय होते का, याचीही तपासणी केली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली असून जखमींना २ ते ५ लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार आहे.
या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा फटाका उद्योगातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील इतर फटाका कारखान्यांची तपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, बचावकार्य सुरू असून अधिकृत मृत आणि जखमींची अंतिम संख्या पुढील काही तासांत स्पष्ट होणार आहे. परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिकांनीही मदतकार्याला हातभार लावला आहे.







