पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलताना स्पष्ट सांगितले की, गेल्या महिन्यात भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धविरामात अमेरिकेचा कोणताही सहभाग नव्हता, आणि त्या काळात अमेरिका-भारत व्यापार कराराबाबत कोणतीही चर्चा झाली नाही.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी सांगितले की, “हा ३५ मिनिटांचा संवाद ट्रम्प यांच्या विनंतीवरून झाला होता. पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितले की, युद्धविरामाच्या संपूर्ण कालावधीत, कोणत्याही टप्प्यावर आणि कोणत्याही स्तरावर, अमेरिका-भारत व्यापार करार किंवा भारत-पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीबाबत चर्चा झाली नाही.”
ऑपरेशन सिंदूरबाबत ट्रम्पना माहिती
हा संवाद ७ मे रोजी भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर दोन्ही नेत्यांमधील पहिला संपर्क होता. हा संपर्क त्या वेळी झाला, जेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर ट्रम्प यांची भेट घेणार होते.
मिस्रि यांनी स्पष्ट केले की, “सैनिकी कारवाई थांबवण्याबाबतची चर्चा भारत आणि पाकिस्तान दरम्यान थेट झाली होती, आणि ती पाकिस्तानच्या विनंतीवरून सुरू झाली होती.”
हे ही वाचा:
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी नेत्याच्या ३ नातेवाईकांची नक्षलवाद्यांकडून हत्या!
काँग्रेसच्या पायाचे चिरे हलले !
पाकिस्तानचे उम्मा चुम्मा ना दे..
एअर इंडियाची फ्लाइट ज्वालामुखीच्या स्फोटामुळे परत दिल्लीत
ट्रम्पचे खोटे दावे फेटाळले
ट्रम्प यांनी पूर्वी वारंवार दावा केला होता की, युद्धविरामासाठी त्यांनी मध्यस्थी केली होती आणि व्यापार थांबवण्याची धमकी दिली होती, म्हणून दोन्ही देश थांबले. मात्र भारताने हे दावे फेटाळून लावत स्पष्ट केले की, पाकिस्तानच्या विनंतीवरून थेट चर्चा होऊनच युद्धविराम ठरला.
अमेरिकेने दिला हल्ल्याचा इशारा
फोनवर बोलताना, मोदींनी ट्रम्प यांना ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली आणि सांगितले की भारताने “अत्यंत मोजून, अचूक आणि आक्रमकतेत वाढ न करणारी कारवाई” केली.
९ मेच्या रात्री अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी वॅन्स यांनी भारताला पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला होता. मोदींनी ट्रम्प यांना सांगितले की, भारताने त्वरित अमेरिकेला कळवले होते की जर पाकिस्तानने हल्ला केला तर भारत अधिक तीव्र प्रतिसाद देईल.
९-१० मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले, त्याला प्रत्युत्तर देताना भारताने पाकिस्तानच्या काही लष्करी तळांना निष्क्रिय केले.
काश्मीरवर कोणतीही मध्यस्थी नाही – मोदींचा पुनरुच्चार
मोदींनी ट्रम्प यांना ठामपणे सांगितले की, काश्मीर प्रश्नावर भारत कोणत्याही त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीला मान्यता देत नाही.
“भारताने कधीही मध्यस्थी स्वीकारलेली नाही, करत नाही आणि कधीच करणार नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले. या मुद्द्यावर भारतात पूर्ण राजकीय एकमत आहे, हेही त्यांनी अधोरेखित केले.
ट्रम्पना QUAD परिषदेसाठी आमंत्रण
या संवादात ट्रम्प यांनी विचारले की, मोदी कॅनडावरून परतताना अमेरिकेत थांबू शकतात का, मात्र मोदींनी पूर्वनियोजित कामांमुळे असमर्थता व्यक्त केली.
तथापि, मोदींनी ट्रम्पना भारतात होणाऱ्या QUAD परिषदेसाठी आमंत्रित केले. ट्रम्प यांनी आमंत्रण स्वीकारले पण हजेरीबाबत पुष्टी दिली नाही.
दोन्ही नेत्यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात स्थैर्य राखण्यासाठी QUAD चे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले.
इस्रायल-इराण संघर्ष आणि युक्रेन युद्धावर चर्चा
दोघांनी इस्रायल-इराण संघर्ष आणि रशिया-युक्रेन युद्धाबाबत चर्चा केली. थेट वाटाघाटीचं महत्त्व मान्य करत, त्यांनी शांती प्रक्रियेस पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.







