अमेरिका-इराण शांतता कराराचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत

पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्याची अपेक्षा केली व्यक्त

अमेरिका-इराण शांतता कराराचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत

पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या समझोत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरून या निर्णयाचे कौतुक करताना म्हटले की, “पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिका आणि इराण यांच्यात झालेल्या कराराचे मी स्वागत करतो. या संघर्षामुळे जगभरात गंभीर आर्थिक अडथळे निर्माण झाले आणि अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली.”

पंतप्रधानांनी या नव्या करारामुळे प्रदेशात शांतता प्रस्थापित होण्याची आशा व्यक्त केली. ते म्हणाले, “या कराराची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होईल. तसेच सागरी मार्गांवरील अखंड वाहतूक आणि जागतिक व्यापार सुरळीत राखण्यासही याची मदत होईल.” मोदी यांनी पुढे सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील उर्वरित मुद्द्यांवरही सकारात्मक संवाद सुरू राहील आणि अखेरीस एक व्यापक व दीर्घकालीन करार होईल, अशी अपेक्षा आहे.

दरम्यान, रविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून या कराराची घोषणा केली. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये म्हटले, “इराणसोबतचा करार आता पूर्ण झाला आहे. सर्वांचे अभिनंदन!” ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याबाबतही घोषणा केली. त्यांनी लिहिले, “जगभरातील जहाजांनो, इंजिन सुरू करा. तेलाचा प्रवाह पुन्हा सुरू होऊ द्या.” इराणनेही सामंजस्य कराराला अंतिम स्वरूप देण्यात आल्याची माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी या कराराला अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर मिळालेलं मोठं यश असे संबोधले. या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारावर मोठा परिणाम झाला होता आणि व्यापक प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली होती.

हे ही वाचा:

कोलकाता विमानतळाजवळील बांकरा मशिदीचे होणार स्थलांतर

तब्बल ६७ लाख किलोमीटरचे रस्ते, भारत जगात नंबर वन

अमेरिका इराण करारानंतर सेन्सेक्स, निफ्टीत धमाका

पंतप्रधानांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यात स्वागत मीठ-भाकरीने

दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी या कराराला “ऐतिहासिक यश” असे संबोधत म्हटले की, “हा महत्त्वपूर्ण करार संपूर्ण प्रदेशात शांतता आणि सुरक्षितता आणेल. अनेक राष्ट्राध्यक्षांनी इराणसोबत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते अपयशी ठरले. आता या प्रदेशातील नेत्यांना खऱ्या अर्थाने शांतता मिळवून देणारे नेतृत्व मिळाले आहे. करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर सागरी मार्गांवरील अडथळे दूर केले जातील आणि तेलाचा पुरवठा पुन्हा सुरळीत सुरू होईल.”

Exit mobile version