पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) गेल्या काही आठवड्यांपासून सुरू असलेल्या सरकारविरोधी आंदोलनाने आता गंभीर स्वरूप धारण केले आहे. जॉइंट आवामी ॲक्शन कमिटी (JAAC) च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाला चिरडण्यासाठी इस्लामाबाद प्रशासनाने अन्नधान्य, इंधन आणि औषधांच्या पुरवठ्यावर निर्बंध घातल्याचा आरोप स्थानिक नागरिक, ट्रक चालक आणि विरोधी पक्षांकडून केला जात आहे. मात्र पाकिस्तानी प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावत कोणतीही नाकेबंदी नसल्याचा दावा केला आहे.
पाकव्याप्त काश्मीर विधानसभेतील १२ राखीव जागांवरून निर्माण झालेल्या वादातून या आंदोलनाची सुरुवात झाली. भारतीय प्रशासित काश्मीरमधील निर्वासितांसाठी राखीव असलेल्या या जागांचा वापर इस्लामाबाद आपल्या पसंतीचे सरकार सत्तेत आणण्यासाठी करत असल्याचा आरोप स्थानिक संघटनांनी केला. याच पार्श्वभूमीवर JAAC ने व्यापक आंदोलन छेडले. आंदोलन वाढताच पाकिस्तान सरकारने JAAC ला दहशतवादी संघटना घोषित केले आणि तिच्या समर्थकांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली. या संघर्षात आतापर्यंत किमान ५८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
JAAC ने दिलेल्या बंदच्या हाकेमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडली असून अनेक शहरांतील बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापने आणि सरकारी कार्यालयांचे कामकाज प्रभावित झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी अनेक प्रमुख रस्त्यांवर धरणे आंदोलन सुरू केल्याने मालवाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. प्रादेशिक राजधानी मुझफ्फराबादसह रावळकोट, बाग, पूंछ आणि नीलम व्हॅली या भागांमध्ये अन्नधान्य, इंधन आणि औषधांची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मोबाईल इंटरनेट सेवाही अनेक ठिकाणी खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
मुझफ्फराबादमधील ६४ वर्षीय रहिवासी मुहम्मद मस्कीन यांनी सांगितले की, अनेक औषध दुकाने बंद असल्याने आवश्यक औषधे मिळत नाहीत. “मी अनेक दिवसांपासून औषधांचा शोध घेत आहे. मोठी दुकानेही बंद आहेत. कुठेही औषधे मिळत नाहीत,” असे त्यांनी सांगितले. दुसरे रहिवासी साबर हुसेन यांनी सांगितले की, बाजारपेठा बंद असल्याने आणि पुरवठा साखळी खंडित झाल्याने अन्नधान्याचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक कुटुंबांना आठवडाभरापेक्षा जास्त काळ आवश्यक वस्तूंशिवाय राहावे लागत आहे.
पूंछ आणि मुझफ्फराबाद जिल्ह्यांतील अनेक पेट्रोल पंप बंद पडले आहेत. वाहनचालकांना काळ्या बाजारातून जास्त किंमत मोजून पेट्रोल खरेदी करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे. सार्वजनिक वाहतुकीवरही याचा मोठा परिणाम झाला असून अनेक मार्गांवरील सेवा बंद आहेत. नीलम जिल्ह्यातील रहिवासी अलिफ दिन यांनी सांगितले की, गेल्या १५ दिवसांपासून पैसे भरूनही त्यांना सरकारी डेपोतून पीठ मिळालेले नाही. “दररोज डेपोमध्ये जातो, पण रिकाम्या हाताने परतावे लागते. बाजारात पीठ मिळते, पण त्याचे दर दुप्पट-तिप्पट झाले आहेत,” असे त्यांनी सांगितले.
टंचाईमुळे अनेक नागरिक अन्नधान्य आणि इंधन खरेदी करण्यासाठी पाकिस्तानमधील रावळपिंडी, इस्लामाबाद आणि खैबर पख्तुनख्वा भागात जात असल्याचे वृत्त आहे. मात्र तेथून खरेदी केलेला माल पाकव्याप्त काश्मीरमध्ये आणण्यापासून पोलिसांकडून रोखले जात असल्याचा आरोप होत आहे. पीठ, तांदूळ, डाळी, भाज्या आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणारे अनेक ट्रक विविध तपासणी नाक्यांवर रोखून धरल्याचा आरोप ट्रक चालकांनी केला आहे. काही ट्रक अनेक दिवसांपासून रस्त्यावर अडकून पडले असून नाशवंत माल खराब होत असल्याचे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पाकव्याप्त काश्मीरच्या प्रवेशद्वारांवर ट्रकांच्या लांबलचक रांगा दिसत आहेत.
हे ही वाचा:
व्हेनेझुएलाला शक्तिशाली भूकंपांचा दुहेरी तडाखा; अनेक इमारती कोसळल्या
वैभव सूर्यवंशीसाठी ICCचा खास नियम
जमीन बळकावल्या प्रकरणी माजी तृणमूल आमदारासह मुलीला नोटीस
तरुणीच्या होणाऱ्या पतीला खासगी फोटो पाठवले, तिघांचा गेला जीव
पाकिस्तानातील प्रमुख विरोधी पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) च्या पाकव्याप्त काश्मीर शाखेनेही प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पक्षाने म्हटले आहे की, नागरिकांना अन्न, पिण्याचे पाणी आणि जीवनरक्षक औषधांपासून वंचित ठेवले जात असून हे मानवी हक्कांचे गंभीर उल्लंघन आहे. दुसरीकडे, पाकव्याप्त काश्मीरमधील पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांच्या मते, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीवर कोणतीही बंदी नाही आणि अन्नधान्याचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे.
