खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय मंत्री, बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इराणकडून निमंत्रण देण्यात आले होते

खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी केंद्रीय मंत्री, बिहारचे राज्यपाल राहणार उपस्थित

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांच्या राजकीय सन्मानाने होणाऱ्या अंत्यसंस्कार सोहळ्यासाठी भारताने उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री पबित्रा मार्गेरिटा आणि बिहारचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सय्यद अता हसनैन हे भारत सरकारचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इराणकडून निमंत्रण देण्यात आले होते, मात्र पूर्वनियोजित परदेश दौऱ्यांमुळे ते उपस्थित राहू शकणार नसल्याने भारताच्या वतीने हे दोन्ही मान्यवर सहभागी होणार आहेत.

इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांनी पंतप्रधान मोदी यांना अधिकृत निमंत्रण पाठवले होते. त्यानंतर भारत सरकारने या कार्यक्रमासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला. या प्रतिनिधीमंडळासोबत परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.

इराणमध्ये खामेनेई यांच्या अंत्यसंस्काराचे कार्यक्रम ४ जुलैपासून सुरू होणार आहेत. तेहरानमध्ये प्रारंभीचे शोकसमारंभ पार पडतील. त्यानंतर धार्मिक नगरी कूम येथे विशेष कार्यक्रम होईल आणि अखेरीस ९ जुलै रोजी त्यांच्या मूळ गावी मशहद येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या कालावधीत अनेक देशांचे प्रतिनिधी, राजनैतिक अधिकारी आणि जागतिक नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

धार्मिक कार्यक्रमात आक्षेपार्ह प्रसारण; ‘जिओ न्यूज’वर १५ दिवसांची बंदी

आसाम-अरुणाचलमध्ये मुसळधार पावसाचा कहर; २२ हजारांहून अधिक नागरिक प्रभावित

जर्मनीत ग्रुमिंग टोळीचे काळे कारनामे; सीरियन पुरुषांसह दोन पाकिस्तानी तरुणांना अटक

नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला फाशी!

भारत आणि इराण यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध लक्षात घेता या प्रतिनिधीमंडळाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ऊर्जा सुरक्षा, चाबहार बंदर प्रकल्प, प्रादेशिक स्थैर्य आणि व्यापार या विषयांमध्ये दोन्ही देशांचे सहकार्य महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या शोकसमारंभात भारताची उपस्थिती ही दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध दृढ असल्याचा संदेश मानली जात आहे. यापूर्वी भारताने इराणचे माजी राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या निधनानंतरही उच्चस्तरीय प्रतिनिधी पाठवून शोक व्यक्त केला होता. खामेनेई यांच्या निधनानंतरही भारताने अधिकृत शोकसंवेदना व्यक्त केल्या असून, आता अंत्यसंस्कारासाठी प्रतिनिधीमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र धोरणातील संतुलित भूमिका कायम ठेवत भारताने इराणसोबतचे संबंध दृढ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा पार्श्वभूमीवर पबित्रा मार्गेरिटा आणि सय्यद अता हसनैन यांची उपस्थिती भारत-इराण संबंधांमध्ये राजनैतिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.

Exit mobile version