पाणी अडवल्यास युद्ध! पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी

सिंधू पाणी वाद चिघळला

पाणी अडवल्यास युद्ध! पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांची भारताला धमकी

सिंधू नदी प्रणालीतील पाण्याच्या वाटपावरून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणखी वाढला असून, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताविरोधात थेट युद्धाचा इशारा दिला आहे. पाकिस्तानच्या जलसुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे वाटल्यास भारताविरुद्ध लष्करी कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एआरवाय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत आसिफ म्हणाले की, पाणी हा पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. “ज्या क्षणी आमच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे वाटेल, त्या क्षणी आम्ही भारताविरुद्ध युद्ध पुकारू,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. भारताचे जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या एका व्हिडिओमधील वक्तव्यानंतर पाकिस्तानची प्रतिक्रिया समोर आली आहे. या व्हिडिओत जून २०२८ पर्यंत पाकिस्तानकडे जाणारा सिंधू नदीच्या पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबवण्याची क्षमता भारताकडे असू शकते, असे संकेत देण्यात आल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

एप्रिल २०२५ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारताने १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित केला होता. या हल्ल्यासाठी पाकिस्तान समर्थित दहशतवादी गटांना जबाबदार धरत, जोपर्यंत पाकिस्तान सीमापार दहशतवादाविरोधात ठोस आणि विश्वासार्ह कारवाई करत नाही, तोपर्यंत करार निलंबित राहील, अशी भूमिका नवी दिल्लीने घेतली आहे.

सिंधू पाणी करारानुसार सिंधू खोऱ्यातील सुमारे ८० टक्के पाणी पाकिस्तानला मिळते. त्यामुळे पाकिस्तानच्या शेती, सिंचन व्यवस्था आणि अर्थव्यवस्थेसाठी हा करार अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास लाखो नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, असा दावा पाकिस्तानने केला आहे.

हे ही वाचा:

अमेरिका-इराण ६० दिवसांच्या शांतता आराखड्यावर सहमत

वाराणशीतील मशिदीबाबत पाकिस्तानला कळवळा, भारताने सुनावले

‘सत्तेशिवाय विकासकामे होत नाहीत’

NEETच्या तणावाची आणखी एक बळी

दरम्यान, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारताने सिंधू पाणी कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. तसेच, भारत चिनाब नदीचे पाणी वळवण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही पाकिस्तानने केला आहे. वाढती पाणीटंचाई, हवामान बदल आणि सीमावाद यांच्या पार्श्वभूमीवर सिंधू नदीचा प्रश्न भारत-पाकिस्तान संबंधांतील आणखी एक गंभीर संघर्षबिंदू बनत असल्याचे चित्र दिसत आहे.

Exit mobile version