जेवण झाल्यानंतर लगेच काहीतरी गोड खावंसं वाटणं ही खूप लोकांची सवय असते. पोट भरलेलं असलं तरी “थोडंसं गोड” खाल्ल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. पण ही फक्त सवय नसून त्यामागे शरीराचे काही संकेत लपलेले असतात. सर्वात मोठं कारण म्हणजे अपूर्ण आहार. आपण जेवताना जर पुरेसं प्रथिने (protein), फायबर किंवा चांगले फॅट्स घेतले नाहीत, तर शरीर पूर्णपणे तृप्त होत नाही. अशावेळी शरीर पटकन ऊर्जा मिळवण्यासाठी गोड पदार्थांची मागणी करतं. म्हणजेच, पोट भरलेलं असलं तरी शरीराला अजून काहीतरी हवं असतं.
हे ही वाचा:
हॉर्मुझ संकटातही भारत निर्धास्त; सरकारचा ‘थार प्लॅन’ ठरतोय प्रभावी
बंगालमधील लोक तृणमुल काँग्रेसला कंटाळलेत
‘छत्रपती संभाजीनगर म्हणा, नाहीतर एकही पैसा मिळणार नाही’
भारताच्या औषध निर्यातीचे १३० अब्ज डॉलरच्या दिशेने वाटचाल
दुसरं कारण म्हणजे रक्तातील साखरेतील बदल. जास्त भात, पोळी, गोड किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्यावर साखर पटकन वाढते आणि नंतर अचानक कमी होते. या घसरणीमुळे पुन्हा गोड खाण्याची इच्छा होते. त्यामुळे हा एक साखरेचा चक्र सुरू राहतो. याशिवाय, आपल्या पोटातील बॅक्टेरियाही यात भूमिका बजावतात. काही बॅक्टेरिया साखरेवर जगतात आणि तेच मेंदूला गोड खाण्याचे सिग्नल देतात. त्यामुळे वारंवार गोड खाण्याची इच्छा वाढते.
मानसिक कारणंही तितकीच महत्त्वाची आहेत. अनेकांना जेवणानंतर गोड खाणं ही सवय किंवा “रिवॉर्ड” वाटते. ताण, कंटाळा किंवा आनंद अशा भावनांशी गोड पदार्थ जोडले गेलेले असतात. त्यामुळे शरीराला गरज नसतानाही मन गोड मागतं.
तज्ञ सांगतात की ही सवय बदलणं अवघड नाही. त्यासाठी आहारात थोडे बदल करणे पुरेसे आहे. जेवणात प्रथिने, भाज्या, डाळी, सुकामेवा आणि चांगले फॅट्स वाढवले तर पोट जास्त वेळ भरलेलं राहते आणि गोड खाण्याची इच्छा कमी होते. तसंच, शरीरात मॅग्नेशियम, क्रोमियम किंवा बी-व्हिटॅमिन्स यांसारख्या घटकांची कमतरता असेल तरी गोड खाण्याची इच्छा वाढू शकते. त्यामुळे संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे.
एकूणच, जेवणानंतर गोड खाण्याची इच्छा ही फक्त सवय नाही, तर शरीर आणि मनाचा एकत्रित परिणाम आहे. योग्य आहार आणि थोडी जागरूकता ठेवली, तर ही सवय सहज कमी करता येऊ शकते.







