यंदाच्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) सभागृहात निवडून आलेल्या एकूण नगरसेवकांपैकी सुमारे ६० टक्के नगरसेविका आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सहा महिलांनी अधिक विजय मिळवला आहे. २२७ नगरसेवकांच्या पूर्ण सभागृहात ११४ जागा महिलांसाठी राखीव आहेत. गुरुवारी झालेल्या निवडणुकीत तब्बल १३५ महिलांनी विजय मिळवला असून, २०१७ मध्ये ही संख्या १२९ होती. तर २०१२ मध्ये महिलांची संख्या १२४ इतकी होती. त्याआधी केवळ ३० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित होत्या.
निवडणुकीच्या सुरुवातीलाच किमान चार महिलांनी खुल्या (अनारक्षित) जागांवरून विजय मिळवला. यामध्ये वॉर्ड ५७ मधून श्रीकला पिल्लई, वॉर्ड २५ मधून निशा परुळेकर- बंगेरा, वॉर्ड ९८ मधील माजी उपमहापौर अलका केरकर आणि वॉर्ड २२५ मधून हर्षिता नरवेकर यांचा समावेश आहे. या चौघीही भाजपच्या उमेदवार होत्या. भाजपने आरक्षण ५० टक्के असतानाही तब्बल ७० टक्के महिला उमेदवार मैदानात उतरवले होते.
हर्षिता नरवेकर यांचा वॉर्ड क्रमांक २२५ महिलांसाठी आरक्षित नव्हता, तरीही दोन्ही पक्षांनी महिला उमेदवार दिले होते. श्रीकला पिल्लई यांचा वॉर्ड ५७ हा ही खुला होता. श्रीकला पिल्लई यांचे वडील रामचंद्र पिल्लई हे त्या मतदारसंघातून पाच वेळा काँग्रेसचे नगरसेवक राहिले आहेत. भाजपच्या जिग्नासा शाह यांनी २० हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला असून हा शहरातील सर्वाधिक मताधिक्यांपैकी एक आहे. आणखी एक भाजप उमेदवार ऋतु तावडे यांनीही १६ हजारांहून अधिक मतांच्या फरकाने विजय मिळवला.
हे ही वाचा:
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार प्रदान होताच समितीने काय म्हटले?
भाजपची रणनीती आणि ठाकरे, पवार राजकीय ‘ब्रँड्स’चा वाजला बँड
दिलासा आणि कृतज्ञता… इराणहून परतलेल्या भारतीयांनी मोदी सरकारचे मानले आभार
पुणे–पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचा पवारांना धक्का
शिवसेना आणि ठाकरे गटासह बहुतांश मोठ्या पक्षांनी यावेळी अधिक महिलांना उमेदवारी दिली. यंदा एकूण १,७०० उमेदवारांपैकी ५० टक्क्यांहून अधिक महिला होत्या. मात्र, २०१७ मध्ये महिलांच्या उमेदवारीचे प्रमाण अधिक होते, असे सांगितले जाते.







