राज्यातील सर्वात मोठी आणि देशातील सर्वाधिक श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई महापालिका) निवडणुकीचे अंतिम निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी मुंबईच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. एकूण २२७ जागांच्या या महापालिकेत सत्तेसाठी ११४ जागांचा बहुमताचा आकडा निर्णायक ठरतो. अंतिम आकडेवारीनुसार भारतीय जनता पार्टी (भाजप) सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असून भाजपने ९६ जागांवर विजय मिळवला आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) असून त्यांनी ६१ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) ला केवळ २६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मनसेने ९ जागा, काँग्रेस–वंचित आघाडीने २१ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अवघी १ जागा मिळाली आहे.
याशिवाय इतर व अपक्ष मिळून ११ जागा जिंकण्यात आल्या असून, यामध्ये ७ जागा एमआयएम, २ जागा समाजवादी पार्टी (सपा) तर उर्वरित २ जागा इतर अपक्षांकडे गेल्या आहेत.
हे ही वाचा :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर #रसमलाई होतेय ट्रेंडिंग; विषय काय?
“विकासाच्या राजकारणाला जनतेने पाठिंबा दिला…”
महानगरपालिकांत धुरंधर भाजपाची कमाई १२३० जागांची
इराण अमेरिकेत संघर्ष होणार? युद्धनौका USS अब्राहम लिंकन पश्चिम आशियाकडे रवाना
या निकालात भाजपची आघाडी स्पष्ट दिसत असली तरी बहुमतासाठी भाजप अजूनही १८ जागांनी कमी आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपकडून एमआयएम, सपा व अपक्ष नगरसेवकांशी थेट किंवा अप्रत्यक्ष चर्चा सुरू झाल्याची माहिती आहे. दुसरीकडे, ठाकरे गट, काँग्रेस–वंचित आघाडी आणि इतर पक्ष एकत्र येण्याची शक्यता तपासली जात असली, तरी त्यांनाही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बाह्य पाठिंब्याची गरज भासणार आहे.
या निकालांचा सर्वात मोठा राजकीय संदेश म्हणजे मुंबईत भाजपची वाढती ताकद. या यशामागे भाजपचे प्रमुख रणनीतीकार म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भूमिका निर्णायक ठरल्याचे बोलले जात आहे. मजबूत संघटन, अचूक उमेदवार निवड, आक्रमक प्रचार आणि विकासकेंद्री मुद्द्यांवर भर देण्याची रणनीती भाजपच्या यशाला कारणीभूत ठरली. त्यामुळेच राजकीय वर्तुळात “देवेंद्रच मुंबईचा धुरंधर” अशी चर्चा रंगताना दिसत आहे.
मतदानाची एकूण टक्केवारी ५६.२ टक्के इतकी नोंदवली गेली. रस्ते, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, झोपडपट्टी पुनर्विकास आणि भ्रष्टाचार हे मुद्दे मतदारांसाठी निर्णायक ठरले. उपनगरांमध्ये भाजपला मोठा प्रतिसाद मिळाला, तर मध्य मुंबईत ठाकरे गटाची पकड काही प्रमाणात कायम राहिली.
आता सर्वांचे लक्ष मुंबई महापालिकेतील महापौरपद, स्थायी समिती आणि सत्तास्थापनेच्या गणितांकडे लागले आहे. पुढील काही दिवसांत कोण कोणासोबत जाणार, हे स्पष्ट होणार असून, त्यावरच मुंबईच्या प्रशासनाची पुढील दिशा ठरणार आहे.







