राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रामदास आठवले, विनोद तावडे, रामदास वडकुते, माया इवनाते यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून निवडल्या जाणाऱ्या सात जागांसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत.
भाजपकडून रामदास आठवले, विनोद तावडे, माया इवनाते आणि रामराव वडकुते यांना संधी देण्यात आली आहे. संख्याबळानुसार भाजपचे चार उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. त्यानुसार भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख जवळ आली असताना, भाजपने राज्यातील चार जागांसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली. या निवडीत राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि प्रादेशिक संतुलन यांचा विशेष विचार केल्याचे दिसते. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यापूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वात आणि राज्यस्तरीय समित्यांमध्ये सखोल चर्चा झाली. अनेक नेत्यांच्या नावांवर विचारविनिमय झाल्यानंतर, या चार नेत्यांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब झाले.
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत असल्याने ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या ३७ जागांसाठी मतदान पार पडणार असून यामध्ये सात जागा या महाराष्ट्रातील आहेत. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ५ मार्च निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर ६ मार्च रोजी अर्जांची छाननी केली जाईल. उमेदवारांना माघार घेण्यासाठी ९ मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदानाची प्रक्रिया १६ मार्च रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार असून निकाल जाहीर केले जातील.
हे ही वाचा:
कतारमध्ये इराणच्या १० गुप्तहेरांच्या आवळल्या मुसक्या
एकाच पत्त्यावर २२ बनावट पासपोर्ट! मास्टरमाइंडसह दोघांना अटक
होळीच्या दिवशी मुंबई पोलिसांचा ‘खाक्या’; १६ हजारांहून अधिक वाहनचालकांवर कारवाई
मृत खामेनी यांचा पुत्र इराणचा सर्वोच्च नेता!
महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणारी ही निवडणूक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. सध्याच्या खासदारांचा कार्यकाळ हा येत्या २ एप्रिल रोजी संपणार आहे. महाराष्ट्रातील शरद पवार गटाच्या फौजिया खान, शरद पवार, ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे. सध्या महाविकास आघाडीचे चार तर भाजप आणि आठवले मिळून तीन खासदार आहेत. हे सर्व येत्या २ एप्रिल रोजी निवृत्त होतील.







