संसदेत घुसखोरी करणाऱ्या कॉकरोचना दिल्ली पोलिसांच्या लाठीचा तडाखा

जंतर-मंतर आंदोलनाला राजकीय वळण

संसदेत घुसखोरी करणाऱ्या कॉकरोचना दिल्ली पोलिसांच्या लाठीचा तडाखा

कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या ‘चला संसद’ मोर्चादरम्यान सोमवारी (२० जुलै) दिल्लीत मोठा गोंधळ उडाला. संसदेकडे जाणाऱ्या आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केला. नीट पेपरफुट, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील घोषणाबाजीमुळे आंदोलनाला राजकीय वळण मिळाले. समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव आणि आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत केंद्र सरकारवर टीका केली.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या आंदोलनाला मोठे राजकीय स्वरूप प्राप्त झाले. सुरुवातीला नीट (NEET) परीक्षा, कथित पेपरफुट आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांपुरते मर्यादित असलेले आंदोलन थेट केंद्र सरकारविरोधातील राजकीय आक्रमणात बदलले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांनी आंदोलनस्थळी हजेरी लावत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली, तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारावी, अशी मागणीही केली.

संसदेकडे ‘चला संसद’ मोर्चा काढण्याची CJP ची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती. मात्र, दिल्ली पोलिसांनी संसद परिसरात लागू असलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १६३ चा हवाला देत मोर्चाला परवानगी नाकारली. त्यानंतर जंतर-मंतर, शास्त्री भवन, रेल भवन आणि संसद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. आंदोलकांना रोखण्यासाठी अनेक स्तरांवर बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. तरीही आंदोलकांनी संसदेकडे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली. काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला, तर शास्त्री भवन परिसरात जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराचाही वापर करण्यात आला.

या आंदोलनाचे मूळ कारण NEET-UG २०२६ पेपरफुट प्रकरण, परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांचा वाढता रोष हे आहे. आंदोलकांचे म्हणणे आहे की, वारंवार होत असलेल्या पेपरफुटांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, त्याची जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने स्वीकारली पाहिजे. त्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सोमवारी या आंदोलनाला समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांनी भेट देत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या कोणालाही माफी मिळू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी सरकारवर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या अभावाचाही आरोप केला.

यासोबतच आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया, आतिशी, राज्यसभा खासदार संजय सिंह आणि गोपाल राय यांनीही आंदोलनस्थळी उपस्थिती लावत आंदोलनाला पाठिंबा दिला. पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेड्स ओलांडून ते आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहोचले. यावेळी सिसोदिया यांनी केंद्र सरकारवर टीका करत, “देशातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत, पण सरकार त्यांचा आवाज ऐकण्याऐवजी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे,” असा आरोप केला. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा करत शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणांची गरज व्यक्त केली.

दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी संसद मार्चपूर्वी आपले उपोषण मागे घेतले. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी उपोषणस्थळावरून सफदरजंग रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांनी उपोषण सुरू केले होते. वांगचुक यांच्या समर्थनासाठी सुरू झालेल्या आंदोलनाने आता देशव्यापी विद्यार्थी चळवळीचे स्वरूप धारण केले आहे.

हे ही वाचा:

चमकली भारतीय दागिन्यांची बाजारपेठ; जूनमध्ये निर्यातीचा विक्रम

संसदेकडे निघालेल्या मोर्चावर अश्रुधुराची कारवाई

‘चला संसद’ मोर्चापूर्वी अभिजीत दिपकेंनी सोडले उपोषण

मानखुर्दमध्ये बेस्ट बस दुभाजकावर आदळली; पादचाऱ्याचा मृत्यू

पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. दिल्ली मेट्रोच्या काही स्थानकांवरही सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध लावण्यात आले. दिल्ली पोलिसांनी हे आंदोलन परवानगीशिवाय काढण्यात आल्याने आवश्यक ती कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

Exit mobile version