एकीकडे पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात धर्म विचारून पर्यटकांना मारले गेले नाही, असा नरेटिव्ह विरोधी पक्षांकडून वारंवार मांडला जात असताना सध्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून परदेशात गेलेले काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मात्र हिंदूंना कसे वेचून मारले हे स्पष्ट करत हा नरेटिव्ह उद्ध्वस्त केला.
अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना थरूर म्हणाले की, जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांनी संख्या वाढू लागली होती, मात्र ही बदलती स्थिती काही लोकांना खुपत होती, त्यामुळे पुन्हा एकदा तिथे दहशतवादी वातावरण तयार व्हावे म्हणून पर्यटकांवर हल्ला करण्याचे ठरविले असणार. मुख्य म्हणजे या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि हिंदू असलेल्या पर्यटकांवर गोळीबार करण्यात आला. त्यातील २५ हे हिंदू होते तर १ नेपाळी होता. ती व्यक्ती नेपाळी असली तरी ती हिंदूच म्हणायला हवी. २५ हिंदू जेव्हा मारले गेले तेव्हाच एक हिंदू प्रोफेसर मात्र त्यात बचावला कारण दहशतवाद्याने त्यांना कलमा पढण्यास सांगितले आणि त्याने तो म्हणून दाखविल्यावर तो बचावला. शिवाय, त्यातील पुरुषांना गोळी घालून त्यातील महिलांना सांगण्यात आले की, तुम्ही हा संदेश आपल्या देशात जाऊन द्या.
पहलगाम येथे हल्ला झाल्यानंतर भारतातील काही लोकांनी असे काही घडलेच नाही. हिंदूंना वेचून वेचून मारण्यात आलेलेच नाही, असा दावा करायला सुरुवात केली होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, दहशतवाद्यांना असे धर्म विचारून कुणाला मारण्यासाठी वेळ कुठे असतो? शरद पवारांनीही असे धर्माच्या नावावर मारले गेलेले नसल्याची टिप्पणी केली होती. त्यामुळे थरूर यांची यासंदर्भातील टिप्पणी महत्त्वाची ठरते आहे.
भारताने दिलेल्या प्रत्युत्तराचे कौतुक
थरूर म्हणाले, “मी सरकारसाठी काम करत नाही, हे तुम्हाला माहीत आहे. मी विरोधी पक्षासाठी काम करतो. मी स्वतः एक लेख लिहिला होता ज्यात म्हटले होते की कठोर पण हुशारीने प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. मला आनंद आहे की भारताने अगदी तसेच केले.”
ते पुढे म्हणाले की, ७ मे रोजी भारताने “अतिशय अचूक आणि नियोजित हल्ले” केले, जे पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ विशिष्ट दहशतवादी तळांवर केंद्रित होते.
थरूर म्हणाले की, आता पाकिस्तानविषयी भारताच्या धोरणात एक नवीन ‘बॉटम लाईन’ ठरवण्याची वेळ आली आहे. “आपण आंतरराष्ट्रीय अहवाल, तक्रारी, सर्व काही वापरून पाहिले आहे,” ते म्हणाले. “पाकिस्तान अजूनही नाकारत आहे. तिथे कोणतेही दोषारोप नाहीत, ना गंभीर गुन्हेगारी खटले, ना दहशतवाद्यांचे जाळे उद्ध्वस्त करण्याचा खरा प्रयत्न. जर त्यांनी हे चालूच ठेवले, तर त्यांना प्रत्युत्तर मिळणारच आहे,” असेही थरूर म्हणाले.
हे ही वाचा:
‘आमच्यात राजकीय मतभेद असतील, पण राष्ट्रीय सुरक्षेवर आमचे एकमत’
विराट कोहली-अनुष्का शर्मा पोहोचले अयोध्येत, राम लल्लाचे घेतले दर्शन!
चार राज्यांमधील ५ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा!
भगवान बिरसा मुंडा यांचा संघर्ष सदैव प्रेरणादायी
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताच्या प्रत्युत्तराचा उल्लेख करताना थरूर म्हणाले की, भारताने आता आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की भारताला पाकिस्तानशी युद्ध नको आहे. आम्हाला आमच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करायचे आहे आणि २१व्या शतकासाठी तयार होत असलेल्या आपल्या लोकांना पुढे नेायचे आहे,” असे त्यांनी सांगितले.
थरूर म्हणाले की, भारत हा संयम बाळगणारा देश आहे, परंतु पाकिस्तानचे तसे नाही. “पाकिस्तान भारताच्या भूमीवर दावा करत राहतो आणि जेव्हा पारंपरिक मार्ग अपयशी ठरतात, तेव्हा दहशतवादाद्वारे आपले उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करतो. हे आपल्याला मान्य नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
थरूर यांचे प्रतिनिधीमंडळ पाच देशांच्या दौऱ्यावर आहे – अमेरिका, पनामा, गायना, ब्राझील आणि कोलंबिया. या प्रतिनिधीमंडळात भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कलीता आणि शशांक मणि त्रिपाठी, लोजप (रामविलास) च्या शांभवी चौधरी, टीडीपीचे जीएम हरीश बालयोगी, शिवसेनेचे मिलिंद देवरा, झारखंड मुक्ति मोर्चाचे सरफराज अहमद, आणि भारताचे माजी अमेरिका राजदूत तरणजीत सिंह संधू यांचा समावेश आहे.







