अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाने राज्यसभा खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील उपनेतेपदावरून काढून टाकले. यामुळे पक्षातील अंतर्गत कलह उघडकीस आल्याचे बोलले जात असताना पक्षाचे नेते आणि खासदार राघव चड्ढा यांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
खासदार राघव चड्ढा म्हणाले की, “जेव्हा जेव्हा मला संसदेत बोलण्याची संधी मिळते, तेव्हा मी सार्वजनिक प्रश्न उपस्थित करतो. मी असे विषय मांडतो ज्यांवर संसदेत क्वचितच चर्चा होते. लोकांचे प्रश्न मांडणे किंवा सार्वजनिक विषयांवर बोलणे हा काही गुन्हा आहे का? मी काही चुकीचे केले आहे का? मी आज हा प्रश्न विचारत आहे कारण आम आदमी पार्टीने (आप) राज्यसभा सचिवालयाला राघव चड्ढा यांना संसदेत बोलण्यापासून रोखण्यास सांगितले आहे,” असे ते म्हणाले.
पक्षावर गंभीर प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले, “मला बोलण्यापासून कोणी का रोखू इच्छिते? मी विमानतळावरील महागडे जेवण, झोमॅटो रायडर्स, टोल प्लाझा आणि बँक शुल्क, आणि १२ महिन्यांत १३ वेळा रिचार्ज करण्याबद्दल बोललो. हे मुद्दे उपस्थित केल्याने सर्वसामान्य माणसाला फायदा झाला, पण आम आदमी पक्षाचे काय नुकसान झाले? मला बोलण्यापासून कोणी का रोखू इच्छिते?”
राघव चड्ढापुढे म्हणाले की, “मला तुमचे आभार मानायचे आहेत. मी तुमचा आहे आणि तुमच्यासाठीच आहे. कृपया माझा हात धरा. ज्यांनी आज संसदेत बोलण्याचा माझा हक्क हिरावून घेतला, त्यांना मी सांगतो, माझ्या मौनाला पराभव समजू नका. मी समुद्र आहे, जो वेळ आल्यावर पुराचे रूप धारण करतो.”
हे ही वाचा:
भारताची तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन लवकरच नौदलाच्या ताफ्यात
रशियाकडून अधिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याचा भारताला प्रस्ताव
पाकिस्तानमध्ये डिझेल ५२० आणि पेट्रोल ४५८ रुपये लिटर
अमेरिकन आर्मी चीफ यांना राजीनामा देण्याचे निर्देश! कारण काय?
गुरुवारी, आम आदमी पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून राघव चड्ढा यांना सभागृहातील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवण्याची विनंती केली आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून पंजाबचे खासदार अशोक मित्तल यांचे नाव सुचवले. एककाळी अरविंद केजरीवाल यांचे विश्वासू सहकारी आणि देशातील सर्वात तरुण खासदारांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राघव चड्ढाने पक्षात, विशेषतः पंजाबमध्ये आणि दिल्लीतील ‘आप’च्या संपूर्ण कार्यकाळात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.







