महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभा निवडणुकीत दिसलं आहे. महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यातही दिसेल. आता काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे? ते महाराष्ट्राच्या मनातलं आहे, असं म्हणणं काही योग्य नाहीये, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबद्दल वक्तव्य केले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावरून सातत्याने बोलले जाते की, महाराष्ट्राच्या हे मनात आहे तेच होत आहे. त्यावरून फडणवीसांनी हे भाष्य केले.
फडणवीस यांना राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीबद्दल विचारण्यात आले तेव्हा फडणवीस बोलत होते. त्यांनी यात राजकारण आणण्याची गरज नसल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंचा आज जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे गेले आनंदाची गोष्ट आहे, यामध्ये राजकारण कशाला आणायचे. आमच्याही शुभेच्छा आहेत, सर्वांच्याच उद्धव ठाकरेंना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जाणं यात राजकारण पाहाणं हे योग्य नाही.
हे ही वाचा:
माओवाद्यांविरोधातील मोहिमेला मिळाले मोठे यश!
मनसा माता मंदिराजवळ चेंगराचेंगरीत ६ मृत्युमुखी
अमेरिकेत टळला मोठा विमान अपघात
सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या परवानगीशिवाय विभागीय आढावा बैठक घेतली होती, यामुळे संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली याबाबत पण फडणवीस यांनी भूमिका मांडली. माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना पत्र पाठवत, राज्यमंत्री म्हणून आपल्याला अशा बैठका घेण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं. या पत्रामुळे महायुतीच्या मंत्र्यांमधील अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू झाली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटले की, ‘पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशापद्धतीनं पत्र लिहून कोणीही वाद तयार करू नये, मंत्र्यांनी आपसात बोलावं, आणि त्यांना काही समस्या असतील तर त्या त्यांनी मला येऊन सांगाव्यात. म्हणजे त्यातील अडचणी आपल्याला दूर करता येतील.
शेवटी राज्य मंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच शासनाचे भाग असतात. सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे यामध्ये कुठलाही संभ्रम नाहीये, मात्र राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असं मानणं ही चुकीचं आहे. राज्य मंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते कॅबिनेट मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाहीत, किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता लागते. त्यामुळे मला असं वाटतं की राज्यमंत्री आणि मंत्री या दोघांनी सामंजस्य दाखवलं पाहिजे.







