आसाममधील भाजपचे नेते हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवार, १२ मे रोजी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. विक्रमी जनादेश मिळवून पक्षाने पुन्हा राज्यात सत्ता काबीज केली असून, यामुळे राज्यातील भाजपप्रणित एनडीए सरकारचा सलग तिसऱ्या कार्यकाळाचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह पक्षातील इतर बड्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी सरमा यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच सरमा यांच्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते रामेश्वर तेली, अजंता नेओग, एजीपी अध्यक्ष अतुल बोरा आणि बीपीएफ आमदार चरण बोरो या चार मंत्र्यांनीही शपथ घेतली.
सरबानंद सोनोवाल यांच्यानंतर २०२१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या हिमंता बिस्वा सरमा यांनी, आसाममध्ये सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पहिले बिगर-काँग्रेस नेते म्हणून राजकीय इतिहास रचला. त्यांच्या या पुनरागमनामुळे, २०१६ मध्ये आघाडीने सरकार स्थापन केल्यापासून आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सलग तिसरा कार्यकाळ मिळाला आहे.
नुकत्याच पार पडलेल्या आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने १२६- सदस्यीय विधानसभेत १०२ जागा जिंकून दणदणीत विजय नोंदवला. एकट्या भाजपने ८२ जागा मिळवून आसाममध्ये पहिल्यांदाच स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला. त्यांचे मित्रपक्ष एजीपी आणि बीपीएफ यांनी प्रत्येकी १० जागा जिंकल्या. या प्रचंड जनादेशामुळे ईशान्य भारतातील भाजपचे सर्वोच्च नेते म्हणून सरमा यांचे स्थान अधिकच मजबूत झाले आणि या प्रदेशात पक्षाचे वर्चस्व कायम असल्याचे अधोरेखित झाले.
हे ही वाचा:
इराणच्या आयआरजीसीची माहिती द्या, १.५ कोटी डॉलर कमवा!
पाकिस्तानची डबल ढोलकी, इराणला हवाई तळ दिला!
जोसेफ विजय यांचा दारू दुकानांवर प्रहार
रशिया- युक्रेन यांच्यात १,००० कैद्यांची होणार अदलाबदल
२०२१ मध्ये मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून, सरमा हे भाजपच्या सर्वात प्रभावशाली प्रादेशिक नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले आहेत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पक्षाच्या विस्तारात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुख्यमंत्री सरमा हे नव्या सरकारच्या पहिल्या १०० दिवसांच्या प्राधान्यक्रमांची घोषणा करतील अशी अपेक्षा असून, पायाभूत सुविधा, गुंतवणूक, कल्याणकारी योजना, भू-सुधारणा आणि आदिवासींचे हक्क ही प्रमुख लक्ष केंद्रे राहण्याची शक्यता आहे.
