तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारताच राज्यात मोठा प्रशासकीय निर्णय घेत ७१७ सरकारी मद्य दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ही सर्व दुकाने तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन (Tasmac) अंतर्गत चालवली जात होती आणि धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था तसेच बसस्थानकांच्या ५०० मीटर परिसरात होती. सरकारने पुढील दोन आठवड्यांत ही दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांचा हा पहिला मोठा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे. राज्य सरकारच्या माहितीनुसार, सध्या तमिळनाडूमध्ये एकूण ४,७६५ Tasmac मद्य दुकाने कार्यरत आहेत. यापैकी ७१७ दुकाने संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांच्या जवळ असल्यामुळे त्यांची ओळख पटवण्यात आली आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, बंद होणाऱ्या दुकानांपैकी २७६ दुकाने मंदिर, मशिदी आणि चर्चसारख्या धार्मिक स्थळांच्या जवळ आहेत. तर १८६ दुकाने शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात आहेत. याशिवाय २५५ दुकाने बसस्थानकांच्या आसपास चालवली जात होती.
नवीन सरकारने या निर्णयाला सामाजिक सुधारणेच्या दिशेने मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक आणि संवेदनशील भागांमध्ये मद्य सहज उपलब्ध असल्याबाबत अनेक दिवसांपासून चिंता व्यक्त केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने स्पष्ट केले.
दरम्यान, शपथविधीनंतर विजय यांनी आणखी काही महत्त्वाच्या निर्णयांनाही मंजुरी दिली. घरगुती वीज ग्राहकांसाठी २०० युनिट मोफत वीज योजना लागू करण्याची घोषणा त्यांनी केली. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल स्थापन करणे आणि राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अँटी-ड्रग युनिट उभारण्यासही मंजुरी देण्यात आली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान विजय यांनी राज्यातील वाढत्या अमली पदार्थांच्या जाळ्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते.
मात्र सर्वाधिक राजकीय चर्चा त्या घोषणेमुळे होत आहे, ज्यामध्ये विजय यांनी डीएमके सरकारच्या २०२१ ते २०२६ या कार्यकाळातील आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका जारी करण्याची घोषणा केली आहे. आपल्या पहिल्या संबोधनात त्यांनी म्हटले, “मला तमिळनाडू सरकारच्या सध्याच्या आर्थिक स्थितीबाबत जनतेला माहिती द्यायची आहे. राज्यावर १० लाख कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे आणि सरकारी तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली आहे, ज्यामुळे असह्य आर्थिक बोजा निर्माण झाला आहे.”
मुख्यमंत्री विजय यांनी कायदा व सुव्यवस्था कठोरपणे लागू करण्याचे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले उचलण्याचे आश्वासनही दिले. विधानसभेत सध्या विजय यांच्या राजीनाम्यानंतर TVK पक्षाकडे १०७ जागा आहेत. याशिवाय काँग्रेस, VCK, IUML आणि डाव्या पक्षांच्या १३ आमदारांचाही सरकारला पाठिंबा आहे. विजय यांना लवकरच विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी फ्लोअर टेस्टला सामोरे जावे लागू शकते.







