पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी भारतीयांना परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचे टाळण्याचे आणि त्याऐवजी देशातच विवाह समारंभ साजरे करण्याचे आवाहन केले. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा वापर कमी करावा आणि आयातीवरील खर्च घटवावा, असे आवाहन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हे विधान केले.
गुजरातमधील वडोदरा येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की परदेशात डेस्टिनेशन वेडिंग करण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन बाहेर जात आहे. सुट्ट्या आणि विवाह समारंभांसाठी भारतीयांनी देशातीलच पर्यटनस्थळांचा विचार करावा, असे त्यांनी सांगितले.
“सुट्ट्या सुरू होताच मुलांच्या हातात परदेशात जाण्याची तिकिटे दिली जातात. आजकाल परदेश प्रवासाचा, विशेषतः डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड वाढला आहे. स्वतःला विचारा — भारतात अशी ठिकाणे नाहीत का जिथे आपण सुट्ट्या घालवू शकतो, आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती देऊ शकतो आणि आपल्या स्थानिक स्थळांचा अभिमान बाळगू शकतो?” असे पंतप्रधान म्हणाले.
मोदी यांनी पुढे सांगितले की भारतात होणाऱ्या विवाहांना सांस्कृतिक आणि भावनिक महत्त्व असते. “जेव्हा भारतात लग्न होते, तेव्हा आपल्या पूर्वजांची भूमी आपल्याला आशीर्वाद देते. भारतात विवाहांसाठी अनेक भव्य स्थळे आहेत,” असे त्यांनी म्हटले.
हे ही वाचा:
अंधेरीत सापडले ४ कोटींचे ड्रग्ज
केरळ काँग्रेसचा तिढा सुटेना; तीन उमेदवार, एक मुख्यमंत्रीपद
भारताने वर्षभर सोनं खरेदी करणं टाळल्यास किती कोटींची होईल बचत?
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर ज्वेलरी शेअर्स ९ टक्क्यांपर्यंत कोसळले
गुजरातमधील स्टेच्यु ऑफ युनिटीला विवाहस्थळ म्हणून प्रोत्साहन देताना मोदी यांनी तेथे विशेष विवाह सुविधा विकसित करण्याचा सल्ला दिला. “आता तुम्ही तुमची लग्ने स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे करण्याचा निर्धार करा. तेथे होणाऱ्या प्रत्येक लग्नात सरदार साहेब स्वतः उपस्थित राहून आपले आशीर्वाद देतील,” असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आयातीत वस्तूंवरील अवलंबित्व कमी करण्याचे आणि परकीय चलनाची बचत करण्याचे आपले व्यापक आवाहनही पुन्हा केले. त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करणे, सार्वजनिक वाहतूक, इलेक्ट्रिक बस आणि मेट्रो सेवांचा अधिक वापर करणे तसेच कारपूलिंगला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले.
“ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी एका वाहनात अधिक लोकांना घेऊन जावे,” असे ते म्हणाले. त्यांनी सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये व्हर्च्युअल बैठका आणि घरून काम करण्याच्या पद्धतींनाही प्रोत्साहन दिले.
पंतप्रधानांनी नागरिकांना “परिस्थिती सामान्य होईपर्यंत” सोन्याची खरेदी पुढे ढकलण्याचेही आवाहन केले. भारत मोठ्या प्रमाणात परकीय चलन सोन्याच्या आयातीवर खर्च करतो, असे त्यांनी नमूद केले.
“देशाचा प्रचंड पैसा सोन्याच्या आयातीवर परदेशात जातो. त्यामुळे मी सर्व देशवासियांना विनंती करतो की परिस्थिती सामान्य होईपर्यंत सोन्याची खरेदी पुढे ढकला,” असे ते म्हणाले.
मोदी यांनी असेही सांगितले की गेल्या काही वर्षांत भारताने कोविड-१९ महामारी, आर्थिक आव्हाने आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावासह अनेक जागतिक संकटांचा सामना केला आहे. पश्चिम आशियातील संघर्षाला त्यांनी “या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक” असे संबोधले आणि त्याचे परिणाम भारतासह जगभर जाणवत असल्याचे सांगितले.
“भारत अनेक वस्तू परदेशातून आयात करण्यासाठी लाखो कोटी रुपयांचे परकीय चलन खर्च करतो. त्याच वेळी आयातीत वस्तूंच्या किंमती वाढत आहेत आणि जागतिक पुरवठा साखळीही गंभीररीत्या विस्कळीत झाली आहे,” असे ते म्हणाले. परदेशात परकीय चलन खर्च करावा लागणाऱ्या आयातीत वस्तू आणि अनावश्यक उपक्रमांवरील अवलंबित्व टाळण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.







