काँग्रेस नेते राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करताना इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचा केलेला उल्लेख आता राजकीय वादाचा विषय ठरला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी राजनैतिक संवादात परस्पर सन्मान राखण्याचे आवाहन केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी भारत आणि इटलीमधील संबंध अलीकडच्या काळात विविध क्षेत्रांमध्ये अधिक व्यापक आणि मजबूत झाल्याचे सांगितले. त्यामुळे दोन्ही देशांनी एकमेकांचा सन्मान राखत परस्पर समजुतीने संबंध आणखी दृढ करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जयस्वाल म्हणाले, “इटलीसोबत भारताचे अत्यंत चांगले संबंध आहेत. अलीकडच्या काळात भारत-इटली संबंध प्रत्येक क्षेत्रात विस्तारले आणि अधिक मजबूत झाले आहेत. राजनैतिक व्यवहाराचा भाग म्हणून हे संबंध आणखी दृढ करताना आपण एकमेकांचा आणि दोन्ही देशांमधील परस्पर समजुतीचा सन्मान राखणे महत्त्वाचे आहे.”
हे ही वाचा:
५१ वर्षांचा दुष्काळ संपवणार; मनप्रीतचा ‘मिशन वर्ल्ड कप’!
भूकंपग्रस्त कोलंबियाला भारताचा मदतीचा हात
पॅलेट गन चालवली असती तर फक्त एकच जखमी झाला असता?
मुंबई विमानतळावर वृद्ध दांपत्याला लुटले
राहुल गांधींची असभ्य भाषा
परराष्ट्र मंत्रालयाची ही प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित रचनात्मक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर केलेल्या टीकेनंतर आली. राहुल गांधी यांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावर उपहासात्मक टिप्पणी करताना परराष्ट्र धोरण म्हणजे इतर देशांच्या नेत्यांना मिठी मारणे, ही कल्पना नेमकी कुठून आली, असा सवाल केला. त्यावरून राहुल गांधींवर टीका झाली. राहुल गांधींनी तर नरेंद्र मोदी आणि इटलीच्या राष्ट्राध्यक्ष मेलोनी यांचाही असभ्य भाषेत उल्लेख केला.
मोदी-मेलोनी संबंधांवरून आधीही चर्चा
जॉर्जिया मेलोनी यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गेल्या काही वर्षांत सातत्याने राजनैतिक संवाद कायम ठेवला आहे. भारत आणि इटली यांच्यातील राजनैतिक, आर्थिक आणि इतर क्षेत्रांतील सहकार्यही वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या मोदींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेमध्ये मेलोनी यांचा उल्लेख झाल्याने या राजकीय टोमणेबाजीला अधिक संदर्भ मिळाला. काँग्रेसकडून मोदींच्या परराष्ट्र धोरणावर सातत्याने टीका केली जात असताना भाजपकडून राहुल गांधी यांनी राजकीय संवादाची मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला जात आहे.
