नीट परीक्षा गैरव्यवहाराच्या आंदोलनानंतर देशभरात चर्चेत आलेल्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)ने आता आपला जनाधार वाढवण्यासाठी मोठी रणनीती आखली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपकेने सप्टेंबरपासून देशभरात ‘क्या बोलती पब्लिक’ ही जनसंवाद मोहीम सुरू करण्याची घोषणा केली आहे. दोन दिवस झालेल्या कोअर टीमच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, या मोहिमेद्वारे थेट जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर पक्षाचा भर राहणार असल्याचे सीजेपीकडून सांगण्यात आले.
अभिजित दिपकेने स्पष्ट केले की, सध्या निवडणूक राजकारणात उतरण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नांवर सरकारवर दबाव निर्माण करणारा सक्षम लोकआंदोलनाचा मंच उभारण्याचे पक्षाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टी सध्या स्वतःला ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून विकसित करणार असून, लोकांच्या प्रश्नांना संघटित आवाज देण्यावर भर दिला जाणार आहे.
हे ही वाचा:
पीओकेतील हिंसाचार लपवण्यासाठी परदेशी पत्रकारांवर कठोर निर्बंध
युपीआए व्यवहारांवर शुल्काचा मार्ग मोकळा
श्रीलंकेत जडेजाचा अनुभव ठरणार भारतासाठी तुरुपाचा पत्ता!
‘विराटची साथ अन् सुवर्णाची वाट!’
‘क्या बोलती पब्लिक’ या मोहिमेअंतर्गत देशातील विविध राज्यांमध्ये जाऊन नागरिक, विद्यार्थी, युवक, महिला आणि विविध सामाजिक घटकांशी थेट संवाद साधला जाणार आहे. बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, वाढती महागाई, खासगी शिक्षण संस्थांची वाढती फी, सरकारी सेवांतील त्रुटी आणि स्थानिक पातळीवरील मूलभूत समस्यांवर नागरिकांची मते जाणून घेतली जाणार आहेत. या संवादातून मिळालेल्या सूचना आणि मागण्यांच्या आधारे पुढील आंदोलनांची दिशा निश्चित केली जाणार असल्याचे पक्षाने सांगितले आहे.
याचबरोबर पक्षाने देशव्यापी सदस्य नोंदणी अभियानालाही गती देण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकाधिक युवकांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना पक्षाशी जोडून प्रत्येक राज्यात संघटन उभारण्यावर भर दिला जाणार आहे. सोशल मीडियासह प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार करण्याची रणनीती आखण्यात आली आहे.
