‘माझी पत्नी गीतांजली यांनी राहुल गांधींबाबत केवळ एकच टिप्पणी केली पण त्यावरून काँग्रेसने आम्हाला सोशल मीडियात खूप ट्रोल केले. मात्र भाजपवर आम्ही कठोर टीका करूनही त्यांनी आमच्याविरोधात एकही टीका करणारी प्रतिक्रिया दिली नाही,’ अशा शब्दांत सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी भाजपचे कौतुक केले. पत्नी गीतांजली यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेसंदर्भात वांगचुक यांनी आपली भूमिका मांडत भाजप आणि काँग्रेसमधील फरक दाखवून दिला.
नीट पेपरफुटी प्रकरणी वांगचुक यांनी जंतरमंतरवर उपोषण केले होते. पण भाजप सरकारने कुठेही वांगचुक यांच्यावर टीका केली नव्हती. उलट २० दिवस उपोषण करून त्यांची प्रकृती बिघडू लागल्यावर त्यांना रुग्णालयात नेले. या आंदोलनात राहुल गांधी सहभागी झाले नाहीत त्यावरून गीतांजली यांनी टीका केली तेव्हा मात्र काँग्रेसने या जोडप्याला भंडावून सोडले.
उपोषण संपल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत वांगचुक म्हणाले, “माझ्या पत्नीने राहुल गांधींबाबत केवळ एकच टिप्पणी केली होती. पण भाजपवर चार-पाच अत्यंत कठोर टीका केल्या होत्या. त्या टीकेवर भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, काँग्रेसच्या व्यवस्थेने मला आणि माझ्या पत्नीला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.”
गीतांजली आंग्मो यांनी यापूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान निवासस्थानाबाहेर झालेल्या काँग्रेसच्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पेपरफुटीविरोधातील हे आंदोलन “प्रामाणिक नव्हते” असे म्हणत त्यांनी, राहुल गांधी यांनी जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हायला हवे होते, असे मत व्यक्त केले होते. तसेच, सोनम वांगचुक २६ दिवस उपोषणावर असताना राहुल गांधी यांनी त्यांची भेट घेतली नाही किंवा उपोषण सोडवण्यासाठी कोणताही प्रयत्न केला नाही, अशी टीकाही त्यांनी केली होती.
हे ही वाचा:
माफिया अतीक अहमदचा मुलगा अबानचा भीषण अपघातात मृत्यू
लैंगिक अत्याचार प्रकरणात तेहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल दोषी
पुणे विषारी दारू प्रकरणी सूत्रधारासह संपूर्ण टोळीवर मकोका
पश्चिम बंगालमध्ये १,२७९ मशिदींवरून भोंगे हटवले
याच संदर्भात वांगचुक यांनी आणखी एक दावा करत सांगितले की, राहुल गांधी यांनीच आपला उपवास सोडावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी पत्नी गीतांजली आंग्मो यांनी सातत्याने प्रयत्न केले. मात्र, राहुल गांधींकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. “त्या राहुल गांधींच्या विरोधात नव्हत्या. उलट त्यांनीच माझा उपवास सोडावा, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या,” असे ते म्हणाले.
