‘ऐसा कोई सगा नहीं, जिसे काँग्रेसने ठगा नहीं’

पंतप्रधान मोदींची बंगळुरूमध्ये कार्यक्रमात काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल

‘ऐसा कोई सगा नहीं, जिसे काँग्रेसने ठगा नहीं’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये आयोजित कार्यक्रमात काँग्रेस पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. “काँग्रेस ही संधीसाधू आणि विश्वासघात करणारी पार्टी आहे. सत्तेसाठी ती कोणाचाही वापर करते आणि वेळ आली की साथ सोडते,” असा आरोप त्यांनी केला.

‘द आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशन’च्या ४५ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी विशेषतः तामिळनाडूतील राजकारणाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, जवळपास २५ ते ३० वर्षे काँग्रेस आणि द्रविड मुन्नेत्र कळघम यांचे घनिष्ठ संबंध होते. अनेक कठीण प्रसंगी द्रविड मुन्नेत्र कळघमने काँग्रेसला साथ दिली, अगदी केंद्रातील सरकार टिकवण्यासाठीही मदत केली. मात्र राजकीय परिस्थिती बदलताच काँग्रेसने द्रविड मुन्नेत्र कळघमची साथ सोडली, असा आरोप मोदींनी केला.
हे ही वाचा:
अशी गाठली चांदीने ऐतिहासिक उंची

सत्तापालट ?  नव्हे, हे तर बंगाल चे सांस्कृतिक पुनर्जागरण

युक्रेन युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर?

द्रविड विचारधाराविरहित थलपती विजय यांचे सरकार तामिळनाडूत स्थापन

मोदी म्हणाले की, “आज काँग्रेस स्वतःच्या बळावर उभी राहू शकत नाही. त्यामुळे ती दुसऱ्या पक्षांच्या आधारावर राजकारण करत आहे. काँग्रेस आता परजीवी पक्ष बनली आहे.” तसेच “असा कोणताही साथीदार नाही ज्याला काँग्रेसने फसवले नाही,” असा टोला त्यांनी लगावला.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारवरही त्यांनी टीका केली. “जनतेच्या प्रश्नांवर काम करण्याऐवजी सरकारचा वेळ अंतर्गत वाद मिटवण्यात जात आहे. मुख्यमंत्री किती काळ पदावर राहणार यावरच अजून निर्णय झालेला नाही,” असे मोदी म्हणाले. राजस्थान, छत्तीसगड आणि केरळमध्येही काँग्रेसमध्ये अशाच प्रकारचे अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

महिलांविषयी काँग्रेसची भूमिका नकारात्मक असल्याचा आरोप करत मोदी म्हणाले की, “नारी शक्ती वंदन विधेयकाला काँग्रेसने विरोध केला. हे विधेयक मंजूर झाले असते तर अधिक महिलांना संसदेत प्रतिनिधित्व मिळाले असते.” देशातील महिला काँग्रेसला कधीही माफ करणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले.

यावेळी मोदी यांनी भाजपच्या अलीकडील निवडणूक यशाचाही उल्लेख केला. पुदुच्चेरी, आसाम आणि पश्चिम बंगालमधील निकालांचा संदर्भ देत त्यांनी भाजपला जनतेचा वाढता पाठिंबा मिळत असल्याचा दावा केला. “आज बंगळुरूच्या भूमीतून भगवा सूर्य उगवला आहे,” असे वक्तव्यही त्यांनी केले.

Exit mobile version