भाजपाच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोरने पाडले खिंडार

बांकीपूर पोटनिवडणुकीत मिळविला ऐतिहासिक विजय

भाजपाच्या बालेकिल्ल्याला प्रशांत किशोरने पाडले खिंडार

बिहारच्या राजकारणात जनसुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सोमवारी ऐतिहासिक कामगिरी केली. बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव करत प्रशांत किशोर यांनी आपल्या पक्षाला पहिला निवडणूक विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे, बांकीपूर मतदारसंघावर तब्बल ३५ वर्षांपासून असलेले भाजपचे वर्चस्व त्यांनी संपुष्टात आणले.

प्रशांत किशोर यांनी भाजपचे उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांचा १९ हजार ३२४ मतांनी पराभव केला. किशोर यांना ६४ हजार १५१ मते, तर नीरज कुमार सिन्हा यांना ४४ हजार ८२७ मते मिळाली. राष्ट्रीय जनता दलाच्या रेखा गुप्ता यांना १४ हजार २७३ मते मिळाली आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

३२ पैकी १५व्या फेरीतच विजय निश्चित

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. प्रत्येक फेरीबरोबर त्यांची आघाडी वाढत गेली. एकूण ३२ फेऱ्यांच्या मतमोजणीत १५व्या फेरीपर्यंत त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला होता. हा विजय केवळ एका पोटनिवडणुकीपुरता मर्यादित नसून, प्रशांत किशोर यांच्या नव्या राजकीय पक्षासाठी मोठा टप्पा मानला जात आहे.

३५ वर्षांचा भाजपचा बालेकिल्ला खालसा

बांकीपूर हा बिहारमधील भाजपचा मजबूत गड मानला जात होता. भाजप नेते नितीन नवीन यांनी राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर ते राज्यसभेवर गेले. भाजपने हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी मोठी ताकद पणाला लावली होती. पक्षाने जवळपास ४० स्टार प्रचारक मैदानात उतरवले होते. हजारो कार्यकर्त्यांनीही प्रचारात सहभाग घेतला. मात्र, प्रशांत किशोर यांच्या सातत्यपूर्ण प्रचारासमोर भाजपला आपला गड वाचवता आला नाही.

भाजप आणि राजदच्या आधीच प्रचाराला सुरुवात

प्रशांत किशोर यांनी निवडणुकीच्या जवळपास दोन महिने आधीपासूनच बँकीपूरमध्ये प्रचार सुरू केला होता. भाजप आणि राजदने पूर्ण ताकदीने प्रचार सुरू करण्यापूर्वीच किशोर यांनी मतदारसंघात आपले संघटन उभे करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी मोठ्या प्रमाणावर जाहीर सभा, घरोघरी संपर्क आणि बूथनिहाय संघटन बांधणी केली. यामुळे जनसुराजला प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत प्रचारात आघाडी मिळाली.

रोजगार, शिक्षण आणि सुशासनावर भर

प्रशांत किशोर यांनी बांकीपूर पोटनिवडणूक ही ‘सम्राट चौधरी सरकारविरोधातील जनमत चाचणी’ असल्याचे चित्र उभे केले होते. विजय निश्चित झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी बांकीपूरच्या मतदारांचे आभार मानले. जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा सन्मान करणे ही आपली पहिली प्राथमिकता असल्याचे त्यांनी सांगितले. बांकीपूरमध्ये पुढील दोन ते तीन महिन्यांत बदल दिसू लागतील, असा दावा त्यांनी केला.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या ‘नानां’चा भलताच थाट!

व्हॅलेंटिन बार्कोची चेल्सीत दमदार एंट्री

पासपोर्ट कालबाह्य, व्हिसाही संपला; स्पा सेंटरमधून थायलंडची महिला ताब्यात

‘आधी उपोषण होऊ द्या, लाठीचार्ज होऊ द्या, मग मी राजीनामा देईन’

मात्र, बांकीपूरला एका रात्रीत बंगळुरूसारखे बनवता येणार नाही, असे सांगत त्यांनी वास्तववादी भूमिका घेतली. त्याचवेळी विकासकामांना लवकरच सुरुवात होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भाजप नेतृत्वालाही दिला संदेश

विजयानंतर प्रशांत किशोर यांनी भाजप नेतृत्वावरही निशाणा साधला. बांकीपूरच्या जनतेने भाजपला स्पष्ट संदेश दिला असून, बिहारला सक्षम आणि प्रामाणिक मुख्यमंत्री हवा आहे, असे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड होते यापेक्षा तो व्यक्ती सक्षम आणि प्रामाणिक असणे महत्त्वाचे आहे. बिहारचा विकास कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे, असे किशोर यांनी स्पष्ट केले.

भाजपने पराभव स्वीकारला

या निकालानंतर बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांनी जनादेशाचा स्वीकार केला. पक्षाला कमी मते का मिळाली, याचा सविस्तर आढावा घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. बांकीपूरच्या विकासासाठी भाजपने यापूर्वीही काम केले असून भविष्यातही मतदारसंघाला प्राधान्य राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Exit mobile version