राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची चर्चा जोरात सुरू असली, तरी ही युती महायुतीसमोर मोठे आव्हान ठरेल, असा दावा वस्तुस्थितीला धरून नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या युतीचा सर्वात मोठा तोटा राज ठाकरे यांनाच होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नेते पूर्वी एकत्र आले असते, तर कदाचित राजकीय समीकरणे वेगळी असू शकली असती. मात्र सध्याची परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. दोन्ही नेत्यांचा जनाधार आणि राजकीय प्रभाव लक्षणीयरीत्या कमी झाला असून, ही युती केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यांच्या मते, या युतीतून राज ठाकरे यांना कोणताही ठोस राजकीय फायदा होणार नाही, तर उद्धव ठाकरे यांना मर्यादित स्वरूपात काहीसा लाभ होऊ शकतो.
हे ही वाचा :
भारताची अर्थव्यवस्था पुन्हा वेगात
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अमेरिकेशी केला ६० वेळा संपर्क
ड्रोन हल्ल्यांविरोधात भारताचे नवे संरक्षण कवच
पंतप्रधान मोदींशी आपले चांगले संबंध !
फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्यावर थेट आरोप करत म्हटले की, मनसे नेतृत्वाने गेल्या अनेक वर्षांत मराठी मतदारांचा विश्वास गमावला आहे. मुंबईतील मराठी कुटुंबांना घरांचा गंभीर प्रश्न भेडसावत असताना, तसेच वसई-विरार, नालासोपारा यांसारख्या भागांत मराठी माणसाला स्थलांतर करावे लागत असताना, या महत्त्वाच्या प्रश्नांवर मनसेकडून ठोस भूमिका घेण्यात अपयश आले. गेल्या पंचवीस वर्षांत ठाकरेंनी मराठी माणसाचा विश्वास गमावल्याचा दावाही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन हीच महायुतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विरोधकांच्या युतीचा कितीही गाजावाजा झाला, तरी मतदार विकासालाच प्राधान्य देतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आगामी महापालिका निवडणुकांमध्येच या युतीचे खरे स्वरूप जनतेसमोर स्पष्ट होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.







