दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) पोटनिवडणुक एक दिवस आधी, आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आपचे ज्येष्ठ नेते आणि दोन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार राजेश गुप्ता यांनी शनिवारी पक्षाला राम राम करत भाजपमध्ये प्रवेश केला. दिल्ली भाजपच्या एका निवेदनानुसार, माजी राष्ट्रीय प्रवक्ते आणि आपचे कर्नाटक प्रभारी असलेले गुप्ता यांना दिल्ली युनिट प्रमुख वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.
“अण्णा हजारे यांच्या आंदोलनादरम्यान स्वतःची नोकरी सोडून त्यांना साथ देणाऱ्या लोकांची आता ‘आप’ला पर्वा राहिलेली नाही. आणखीही बरेच लोक पक्ष (आप) सोडू इच्छितात आणि मला वाटते की त्यांनी सोडले पाहिजे. त्यांनी अशा ठिकाणी जावे जिथे त्यांना आदर मिळेल,” अशी खंत राजेश गुप्ता यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले पक्षात असताना त्यांचे संयोजक बोलले नाहीत किंवा भेटले नाहीत. अरविंद केजरीवाल यांना विचार करावा लागेल की लोक सोडून का जात आहेत.
राजेश गुप्ता यांनी आरोप केला की, आप आणि अरविंद केजरीवाल यांच्या पतनामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पक्षाची कार्यकर्त्यांशी “वापरा आणि फेका” अशा पद्धतीने वागण्याची सवय आहे. राजेश गुप्ता हे ‘आप’ सोबतच्या त्यांच्या वर्षांची आठवण करून देताना भावनिक झाले. ते पुढे म्हणाले की जेव्हा ‘आप’ची स्थापना झाली तेव्हा अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी केजरीवालांशी हातमिळवणी केली परंतु त्यांनी सर्वांचा विश्वासघात केला, ज्यामुळे अनेक जण एकामागून एक पक्ष सोडून गेले आणि आज, दुर्दैवाने, मी देखील त्या यादीत सामील झालो आहे, असेही ते म्हणाले.







