मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती झाली असून याच पार्श्वभूमीवर त्यांनी संयुक्त मुलाखत दिली. पहिल्या भागात त्यांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा डाव भाजपाचा असल्याचा पुनरुच्चार केला तर आता दुसऱ्या भागात त्यांनी पुन्हा भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. तसेच राज ठाकरे यांनी वाढवण बंदराजवळील विमानतळाविषयी मत मांडलं. तर, अदानी- अंबानी या उद्योगपतींविषयीही भाष्य केले.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा पुन्हा गंभीर आरोप केला. तर राज ठाकरे यांनी मुंबईच्या जवळचा आणि गुजरातला लागून असलेल्या भागाविषयी भाष्य करत म्हटले की, महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. स्ट्रॅटॅजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे, असं मत त्यांनी मांडले. वाढवण बंदर आणि या बंदराला लागून विमानतळ बांधण्याचे सुरू आहे. हे विमानतळ कशासाठी आणले जात आहे? असा सवाल करण्यात आला.
“मुंबईनंतर नवीन मुंबईत जे विमानतळ झालंय. मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे. पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताच मुंबईतील विमानतळ अदानीकडे आहे. विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी ५० शिवाजी पार्क मैदानं बसतील इतकं मोठे ते आहे. म्हणजे उद्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सर्व भाग विकायाला काढायचा हा त्यांचा प्लॅन आहे,” असा दावा राज ठाकरेंनी केला.
राज ठाकरे यांनी अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक सांगताना म्हटले की, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हे मोदी मोठे झाल्यानंतरच मोठे झाले आहेत. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्याचवेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींना अनेक गोष्टी मिळाला आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, सूर्य- चंद्र असेपर्यंत मी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं होऊ देणार नाही. तुम्ही याच्यावर विश्वास ठेवता का? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला असता राज ठाकरे म्हणाले की, फडणवीसांची इच्छा चांगली असली तरी मुळात त्यांच्या हातात काहीच नाही. त्यांना ‘वरून’ म्हणजे दिल्लीतून जे सांगितलं जातं तेच त्यांना ऐकांव लागतं. त्यामुळं वरच्यांच्या मनात काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.
हेही वाचा..
भादेवीतील जत्रेवर निवडणुकीचा फटका
दीपू दास हत्याकांडातील मुख्य आरोपी, यासीन अराफतला ठोकल्या बेड्या
भारताची आर्थिक वाढ एनएसओच्या अंदाजापेक्षा जास्त राहण्याची शक्यता
उद्धव ठाकरे म्हणाले की, मुळात मुंबई महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, पण ज्या पद्धतीने मुंबईची संस्कृती मारली जातेय ते चिंताजनक आहे. आजकाल कोणीही येतो आणि म्हणतो की या भागाची भाषा गुजराती आहे. म्हणजे आपली सगळी अस्मिता मारायची , संस्कृती मारायची आणि मग काय ? केवळ नावापुरती मुंबई महाराष्ट्रात ठेवणार, याला काही अर्थचं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.







