दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटावर प्रतिक्रिया देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी तीव्र शब्दांत सांगितले की, “जे लोक ‘वंदे मातरम’ म्हणण्यास टाळतात, ते खरे भारतीय असूच शकत नाहीत.” त्यांनी नागरिकांना अशा लोकांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, दिल्ली स्फोट प्रकरणाशी संबंधित ऑनलाईन आक्षेपार्ह आणि भडकाऊ सामग्री पसरविल्याच्या आरोपावरून आसाम पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले, “जे लोक ‘वंदे मातरम’ म्हणत नाहीत, ते भारत मातेबद्दलच्या भावनेला समजूच शकत नाहीत. अशा लोकांपासून सदैव सावध राहणे आवश्यक आहे, कारण हे लोक जेव्हा शिक्षित होतात तेव्हा अधिक शक्तिशाली बॉम्ब आणि धोकादायक कट कारस्थानं रचतात.” ते पुढे म्हणाले , “आपल्याला नेहमी शिकवले गेले की शिक्षित माणूस कधीही दहशतवादाच्या मार्गावर जात नाही, परंतु आज ही समजूत चुकीची ठरत आहे. फक्त शिक्षण माणसाला योग्य मार्गावर ठेवू शकत नाही; कधी कधी हेच शिक्षण त्याला अधिक धोकादायक बनवते. आपण पाहिले आहे की डॉक्टरसारखे व्यावसायिकसुद्धा अशा कृत्यांमध्ये सहभागी झालेले आहेत.”
हेही वाचा..
दहशतवादी कारवायांमुळे काश्मीरमधून बडतर्फ केलेला प्राध्यापक अल फलाह विद्यापीठात नोकरीला
अमरावतीत नवरदेवावर हल्ला करून पळणाऱ्याचा ड्रोनने केला पाठलाग
पाकिस्तानी पत्रकार ताहाने दिल्ली स्फोटाला जबाबदार धरले पाकिस्तानलाच
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरण: ह्युंडाई आय२० सोबत आणखी एक लाल रंगांची गाडी होती?
सरमा यांनी दावा केला की दिल्ली स्फोट प्रकरणात अटक केलेला डॉक्टर यापूर्वीही अनेक घटनांमध्ये सहभागी होता. चौकशीत त्याने कबूल केले की कॉलेजच्या काळात तो हिंदू मुलींना फसवून मुस्लिम मुलांशी विवाह करून धर्मांतर घडवून आणण्याच्या कटात सामील होता. मुख्यमंत्री म्हणाले, “जम्मूतील पहलगाम हल्ला आणि आता झालेला दिल्ली स्फोट, या दोन्ही घटना आपल्याला सतत सजग राहण्याचा इशारा देतात. देशाने या धोक्यांशी लढण्यासाठी कायम जागरूक राहिले पाहिजे.”
मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर पोस्ट करत लिहिले, “अलीकडे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाच्या संदर्भात आसाम पोलिसांनी ऑनलाईन आक्षेपार्ह आणि भडकाऊ सामग्री पसरवल्याच्या आरोपावरून खालील पाच जणांना अटक केली आहे. मतिउर रहमान (दरांग), हसन अली मंडल (गोलपारा), अब्दुल लतीफ (चिरांग), वजहुल कमाल (कामरूप) आणि नूर अमीन अहमद (बोंगाईगांव).” ते पुढे म्हणाले, “आसाम पोलीस सोशल मीडियाचा गैरवापर करून द्वेष पसरविणारे किंवा दहशतवादाचे गौरवगान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीविरुद्ध कठोर आणि तात्काळ कारवाई करत राहतील.”







